Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय दुसरा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम

 
संजय उवाच :
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन: ।।१।।
मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुळ रुदनातें । करीतु असे ।।१।। तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ।।२।। जैसें लवण जळें झळंबले । नातरी अभ्र वातें हालें । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ।।३।। म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंसु ।।४।। तयापरी तो पंडुकुमरु । महामोहें अति जर्जरु। देखोनी श्रीशारंगधरु । काय बोले ।।५।।
श्रीभगवानुवाच :
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ।।२।।
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इयें ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ।।६।। तुज सांगें काय झालें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिसा ।।७।। तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी । तुझेनि नामे अपयशी । दिशा लंघिजे ।।८।। तूं शूरवृत्तिचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ।।९।। तुवां संग्रामी हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वांसी ।।१०।। हे पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझें ।।११।। तो तूं कीं आजि येथें । सांडूनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करीतु आहासी ।।१२।। विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ।।१३।। नातरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे  । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकांतें ।।१४।। कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गे काळकूट मरे । सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ।।१५।। सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि का जाहला । परी तो त्वां साच केला । आजि येथ ।।१६।। म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करुनियां मना । सावधान होर्इं ।।१७।। सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ।।१८।। हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायीं ।।१९।। हें असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ।।२०।।
क्लैब्यं मा स्म गम: पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।३।।
म्हणोनि शोकु न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरी । पांडुकुमरा ।।२१।। तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तू अझुनीवरी हित । विचारीं पां ।।२२।। येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे जाहले तुज ।।२३।। तु आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशय आतां ।।२४।। आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ।।२५।। तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवांं ।।२६।। मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ।।२७।। हृदयाचें ढिलेंपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसी ।।२८।। ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ।।२९।।
अर्जुन उवाच :
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभि: प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ।।४।।
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधी तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा ।।३०।। हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हां ।।३१।। देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती । तियें पाठीं केविं वधिजती । आपुलां हातीं ।।३२।। देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें  वाचा ।।३३।। तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें वर्ततसे ।।३४।। जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं । तयां प्रत्यक्ष केवीं करूं घातु देवा ।।३५।। वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहलें । जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ।।३६।। मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ।।३७।। जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ।।३८।।
गुरूनहत्वा हि महानुभावान् -श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव -भुञ्जीय भोगान् रूधिरप्रदिग्धान् ।।५।।
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाज देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ।।३९।। हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परी अगाध भलें गहन । हृदय याचें ।।४०।। वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परी मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ।।४१।। स्नेहालागीं माये । म्हणिपें तें कीरु होये । पण कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ।।४२।। हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ।।४३।। हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु । आता सांग पा येथ घातु । चिंतूं येईल ।।४४।। ऐसे हे रणीं वधावें । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना नये आघवें । जीवितेंसीं ।।४५।। हें येणें मानें दुर्भर । जे यांहींहूंनि भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ।।४६।। नातरी देशत्यागें जाइजे । कां गिरीकंदर सेविजे । परी शस्त्र हांता न धरिजे । इयांवरी ।।४७।। देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं भोग गिंवसावें रुधिरीं । बुडाले जें ।।४८।। ते काढूनि काय किजती । लिप्त केवीं सेविजती । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ।।४९।। ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ।।५०।।  हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलो लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ।।५१।।
न चैतद्विद्म: कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु: ।
यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेऽवस्थिता: प्रमुखे धार्तराष्ट्रा: ।।६।।
ये-हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों येथें । परी निके काय यापरौतें । तें तुम्ही जाणा ।।५२।। पै विरुं जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजे । उभे आहाती ।।५३।। आतां ऐसेयांते वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहोंमाजीं करावे । तें नेणों आम्ही ।।५४।।
कार्पण्यदोषोपहतस्वभाव: पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता: ।
यच्छ्रेय: स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ।।७।।
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे येथ । जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ।।५५।। तिमिराविरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पांसींच असतां न दिसे । वस्तुजात ।।५६।। देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंहि नेणें ।।५७।। तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जें सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ।।५८।। तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता। आपदीं आमुतें ।।५९।। जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणे अव्हेरूं । की सरितांते सागरु । त्यजी केवीं ।।६०।। नातरी अपत्यातें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेनि जिये । ऐकें कृष्णा ।। ६१।। तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणिक बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ।।६२।। तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगे आतां ।।६३।।
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ।।८।।
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ।।६४।। एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा ।।६५।। जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जऱ्ही पेरिलीं । तरी न विरूढतीं सिंचलीं । आवडे तैसीं ।।६६।। नातरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ।।६७।। तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धी । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ।।६८।। ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांती सांडिला । मग पुनरपि व्यापिला । ऊर्मी तेणें ।।६९।। कीं मज पाहतां ऊर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पे ।।७०।। सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचा भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ।।७१।। हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवे विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ।।७२।। तैसिया पंडुकुमरां व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ।।७३।। म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ।।७४।। मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळुनु । जैसा घनपडळीं भानु आच्छादिजे ।।७५।। तयापरी तो धनुर्धरू । जाहलासे दु:खें जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ।।७६।। म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ।।७७।। तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ।।७८।। आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळू निवेल । मग नवी विरुढी फुटेल ।  उन्मेषाची ।।७९।। ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ।।८०।।
संजय उवाच :
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेश: परंतप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ।।९।।
ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ।।८१।। आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजे येथें । भरंवसेनि ।।८२।। एेंसे येकिहेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ।।८३।।
तमुवाच हृषीकेश: प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच: ।।१०।।
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणे । काय कीजे ।।८४।। हा उमजें आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । आनुमानी कां ।।८५।। ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूची निरवधि । निदानींची ।।८६।। तैसें विवरतु असे श्रीअनंतु । तया दोहीं सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ।।८७।। तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसें मातेचां कोपीं थोकलें । स्नेह आथी ।।८८।। कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ।।८९।। तैसीं वरीवरी पाहतां उदासे । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ।।९०।।
श्रीभगवानुवाच :
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिता: ।।११।।
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें । जें तुवा येथ आदरिलें । माझारींचि ।।९१।। तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतेें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ।।९२।। जात्यंधा लागे पिसें । मग ते सैरा धांवें जैसें । तुझें शहाणपण तैसें । दिसतसें ।।९३।। तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी पुढतपुढती ।।९४।। तरी सांग पां मग अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी ।।९५।। एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हे वायाचि काय बोलती । जगामाजीं ।।९६।। हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ।।९७।। तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायी हे होती । चिरंतन ।।९८।। कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकू हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ।।९९।। अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां का शोचावें । सांगें मज ।।१००।। परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीती सांगसी । आम्हांप्रति ।।१।। देखें विवेकी जे होती । ते दोहींतेंही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां ।।२।।
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा: ।
न चैव न भविष्याम: सर्वे वयमत: परम् ।।१२।।
अर्जुना सांगेन आईक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरूनी ।।३।। नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाऊनि । हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्ही नाहीं ।।४।। हें उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । ये-हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ।।५।। जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहालें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ।।६।। तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ।।७।।
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ।।१३।।
आइकें शरीर तरी एक । परी वयसाभेदें अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ।।८।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि न नाशे । एकेकासवें ।।९।। तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरें होतीं जातीं पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदु:ख ।।११०।।
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदु:खदा: ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ।।१४।।
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंत:करण । म्हणऊनि भ्रमे ।।११।। इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ।।१२।। जयां विषयांचां ठायीं । एकनिष्ठता कंहीं नाहीं । तेथ दु:ख आणि कांहीं । सुखहि दिसे ।।१३।। देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।।१४।। मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ।।१५।। भ्यासुर आणि सुरेख । हें रूपांचें स्वरूप देख । जे उपजवी सुखदु:ख । नेत्रद्वारें ।।१६।। सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु। तोषु देता ।।१७।। तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु । म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ।।१८।। देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदु:खी आकळिजे । आपणपें ।।१९।। या विषयांवांचूनि कांहीं । आणिक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावचि पाही । इंद्रियांचा ।।१२०।। हे विषय तरी कैसे । रोहिणींचे जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ।।२१।। देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरी । धनुर्धरा ।।२२।।
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदु:खसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ।।१५।।
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदु:खे दोन्हीं न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ।।२३।। तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्थां । नागवेचि ।।२४।।
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।।१६।।
आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आईक । जे विचारे पर लोक । ओळखिती ।।२५।। या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।।२६।। सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ।।२७।। कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ।।२८।। ना तरी जाणिवेचिया आयणी । करितां दधि कडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ।।२९।। कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलेंं ।।१३०।। तैसें विचारितां निरसलें । ते प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ।।३१।। म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ।।३२।।
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।१७।।
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार ते स्वभावता । नित्य जाणें ।।३३।। हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ।।३४।। जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदाचि नोहे ।।३५।।
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण: ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ।।१८।।
आणि शरीरजात आघवें । हे नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवा झुंजावे । पंडुकुमरा ।।३६।।
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ।।१९।।
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ।।३७।। तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ।।३८।।
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२०।।
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुष: पार्थ कं घातयति हन्ति कम् ।।२१।।
जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ।।३९।। तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रूपे ।।१४०।। कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ।।४१।। ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे । तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ।।४२।। तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणऊनि तूं हे नारोपीं भ्रांति बापा ।।४३।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२२।।
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ।।४४।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।।२३।।
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन: ।।२४।।
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ।।४५।। हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ।।४६।। अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ।।४७।।
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ।।२५।।
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ।।४८।। हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । नि:सीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ।।४९।। हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसि अतीतु ।  अनादि अविकृतु । सर्वरूप ।।१५०।। अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ।।५१।।
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ।।२६।।
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हे मानिसी । तऱहीं शोचूं न पवसी । पंडुकुमरा ।।५२।। जें आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ।।५३।। तें आदि नाही खंडलें । समुद्रीं तरी असे मिनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ।।५४।। इयें तिन्ही तयापरी । सरसीच सदा अवधारीं । भूतांसि कवणीं अवसरीं । ठाकतीना ।।५५।। म्हणोनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ।।५६।। नातरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकू अधीना । जन्मक्षया ।।५७।। तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । जे जन्म मृत्यु हे पाहीं ।अपरिहर ।।५८।।
जातस्य हि ध्रुवो मृत्युध्र्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।२७।।
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपी दिसे । हें घटिकायंत्र तैैसें । परिभ्रमे गा ।।५९।। ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ।।१६०।। महाप्रलय अवसरें । हें त्रैलोक्यही संहरें । म्हणोनि हा न परिहरे । आदि अंतु ।।६१।। तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ।।६२।। एथ आणिकही एक पार्था । तुज बहूतीं परी पाहतां । दु:ख करावया सर्वथा । विषो नाहीं ।।६३।।
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२८।।
जेें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमृर्तें । मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया । ।।६४।। तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ।।६५।। येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ।।६६।। ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । कां परापेक्षा अळंकार- । व्यक्ति कनकीं ।।६७।। तैसे सकळ हें मूर्त ।  जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटळ ।।६८।। तैसें आदीचि जें नाहीं । तयालागी तूं रुदसि कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ।।६९।। जयाची आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ।।१७०।। दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें आचरताती ।।७१।।
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्य: ।
आश्चर्यवच्चैनमन्य: श्रृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ।।२९।।
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ।।७२।। एकां गुणानुवाद करितां । उपरति होऊनि चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ।।७३।। एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रुपता ।।७४।। जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ।।७५।। तैसिया योगेश्वरांचिया मती । मिळणीं सवे एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ।।७६।।
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ।।३०।।
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ।।७७।। याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ।।७८।। ए-हवी तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परी ।।७९।।
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ।।३१।।
तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ।।१८०।। या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें । कीं युगचि हें बुडालें । जऱही एथ ।।८१।। तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ।।८२।। अर्जुना तुझें चित्त । जऱही जाहले द्रवीभूत । तऱही हें अनुचित । संग्रामसमयीं ।।८३।। अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासी नाही म्हणितले । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ।।८४।। तैसें आनीं आन करितां । नाशु होईल हिता । म्हणऊनि तूं आतां । सावध होर्इं ।।८५।। वायाचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ।।८६।। जैसे मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ।।८७।। तयापरी पार्था  । स्वधर्में राहाटतां । सकळकामपूर्णता । सहजें होय ।।८८।। म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणिक कांहीं । संग्रामांवाचूनि नाहीं । उचित जाणें ।।८९।। निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ।।१९०।।
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिन: क्षत्रिया: पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ।।३२।।
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काज दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ।।९१।। हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापे । उदो केला ।।९२।। नातरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ।।९३।। क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तै झुंज ऐसें हे लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ।।९४।। ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयुख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ।।९५।।
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
तत: स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ।।३३।।
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होइजे । आपणपेयां ।।९६।। पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ।।९७।। तरी असती कीर्ति जाईल । जगचि आभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ।।९८।। जैसी भर्तारेहीन वनिता । उपहति पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ।।९९।। ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ।।२००।।
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ।।३४।।
म्हणोनि स्वधर्मु हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ।।१।। जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केविं निगावें । एथोनियां ।।२।। तूं निर्मत्सरु सदयता । एथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्तां । न मनेल ययां ।।३।। हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळूपणें ।।४।। ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ।।५।।
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथा: ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ।।३५।।
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजो आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ।।६।। तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां कां प्रत्यया येईल मना । सांगें मज ।।७।।
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिता: ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दु:खतरं नु किम् ।।३६।।
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगें बोलु उरला । निका कायी ।।८।। लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ।।९।। ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ।।१०।। तैसी कीर्ती नि:सीम । तुझा ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ।।११।। दिगंतींचे भूपती । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलियां दचकती । कृतांतादिक ।।१२।। ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट । जया देखी जगीं सुभट । वांठ जाहली ।।१३।। तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ।।१४।। जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ।।१५।। जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैंसे अर्जुना हे तूंते । मानिती सदा ।।१६।। तें अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजताचि ।।१७।। आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ।।१८।। मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेंपणें कां न झुंजावे । हे जिंतलें तरी भोगावें । पृथ्वीतळ ।।१९।।
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।।३७।।
ना तरी रणीं एथ । झुंजता वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ।।२२०।। म्हणोनि ये गोष्टी । विचारु न करी किरिटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजे वेगीं ।।२१।। देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ।।२२।। सांगे प्लवेंचि काय बुडिजे । का मार्गीं जाता आडळिजे । परी विपाये चालों नेणिजे । तरी तेंहीं घडे ।।२३।। अमृतें तरीचि मरिजे । जरी विखेसीं सेविजे । तैसा स्वधर्मे दोषु पाविजे । हेतुकपणें ।।२४।। म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडूनि सर्वथा । क्षात्रवृत्ती झुंजता । पाप नाहीं ।।२५।।
सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।३८।।
सुखीं संतोषा न यावें । दु:खीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ।।२६।। एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांहीं पुढील । चिंतावेंना ।।२७।। आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ।।२८।। ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणोनि आतां झुंजावे । निभ्रांत तुवां ।।२९।।
एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ।।३९।।
हे सांख्यस्थिती मुकुळित । सांगितली तुज एथ । आता बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ।।२३०।। जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पावे ।।३१।। जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ।।३२।।
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।।४०।।
तैसें ऐहिक तरी न नाशे । आणि मोक्षु उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ।।३३।। कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळा न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ।।३४।। तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि । हा असताचि उपाधि । आकळूं न सके ।।३५।। जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ।।३६।। अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ।।३७।।
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ।।४१।।
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी । तैसी सद्बुद्धि हे थेंकुटी । म्हणों नये ।।३८।। पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ।।३९।। आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ।।२४०।। तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसि उदधि । निरंतर ।।४१।। तैसी ईश्वरावांचुनि कांहीं । जिये आणिक लाणी नाही । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ।।४२।। येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ।।४३।। म्हणोनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ।।४४।।
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चित: ।
वेदवादरता: पार्थ नान्यदस्तीति वादिन: ।।४२।।
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ।।४५।। म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ।।४६।। एथ हे वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ।।४७।।
कामात्मान: स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ।।४३।।
देखें कामनाअभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ।।४८।। क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ।।४९।।
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयाऽपहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते ।।४४।।
परी एकचि कुडें करिती । जें स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ।।२५०।। जैसा कर्पूराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे । कां मिष्टान्नीं संचरविजे काळकूट ।।५१।। दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ।।५२।। सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ।।५३।। जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी । तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ।।५४।। म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ।।५५।।
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो  नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।।४५।।
तिहीं गुणीं आवृत्त । हे वेद जाण निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ।।५६।। येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ।।५७।। म्हणोनि तूं जाण । हे सुखदु:खासीच कारण । एथ झणे अंत:करण । रिगो देसी ।।५८।। तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणी ।।५९।।
यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत: ।।४६।।
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तऱही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ।।२६०।। जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेही काय चालिजती । सांगें मज ।।६१।। कां उदकमय सकळ । जऱही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ।।६२।। तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती शाश्वत जें ।।६३।।
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।४७।।
म्हणौनि आइकें पार्था । याचि परी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ।।६४।। आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जे न सांडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ।।६५।। परी कर्मफळी आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ।।६६।।
योगस्थ: कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्योे: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।४८।।
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकूनी । मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ।।६७।। परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावें । तरी विशेषे तेथ तोषावें । हेंही नको ।।६८।। कां निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचत ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ।।६९।। आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जाहलें । ऐसेंचि मानीं ।।२७०।। देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे । तरी परिपूर्ण सहजें । जाहलें जाणें ।।७१।। देखें संतासंती कर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं । तेचि योगस्थिती उत्तमीं । प्रशंसिजे ।।७२।।
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव: ।।४९।।
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम् ।।५०।।
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ।।७३।। तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ।।७४।। परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें कर्मशेष सहजें । योगस्थिती ।।७५।। म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होर्इं स्थिरु । मनें करीं अव्हेरु । फळहेतूचा ।।७६।। जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयसंबंधी सांडिले । पापपुण्यीं ।।७७।।
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: ।
जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ।।५१।।
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाती लोपती । अर्जुना तयां ।।७८।। मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा ।।७९।।
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ।।५२।।
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ।।२८०।। मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडे होईल मन । अपैसें तुझें ।।८१।। तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागीलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें पारुषेल ।।८२।।
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ।।५३।।
इंद्रियांचिया संगतीं । जिये पसरु होतसे मति । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ।।८३।। समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं
सकळ । योगस्थिती ।।८४।।
अर्जुन उवाच :
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।।५४।।
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ।।८५।। मग अच्युत म्हणे सुखें । जे किरीटी तुज निकें । ते पूस पां उन्मेखें । मनाचेनि ।।८६।। या बोला पार्थें । म्हणीतलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केंवीं ।।८७।। आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ।।८८।। तो कवणे स्थितीं असे । कैसेनि रूपीं विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ।।८९।। तंव परब्रह्म अवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ।।२९०।।
श्रीभगवानुवाच :
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते ।।५५।।
म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसी । करित असे ।।९१।। जो सर्वदा नित्यतृप्तु । अंत:करणभरितु । परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ।।९२।। तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणें ।।९३।।
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: ।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते ।।५६।।
नाना दु:खीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ।।९४।। अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणे कहीं । परिपूर्णु तो ।।९५।। ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ।।९६।।
य: सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।५७।।
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ।।९७।। ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळें ।।९८।। गोमटें कांहीं पावे । तरी संतोषे तेणें नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विषादासी ।।९९।। ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ।।३००।।
यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानीव सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।५८।।
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ।।१।। तैसी इंद्रियें आपैती होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाचि प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।।२।।
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन: ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ।।५९।।
अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । जें विषयांतें साधक । त्यजिती नियमें ।।३।। श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परी रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ।।४।। जैसी वरिवरी पालवी खुडीजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।५।। तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि अंगें फांके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ।।६।। येरा इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटे । जे जीवन हें न घटे । येणेंविण ।।७।। मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ।।८।। तैं  शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोहंभावप्रतीती । प्रगट होय ।।९।।
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित: ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन: ।।६०।।
ये-हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहटताती जतना । निरंतर ।।३१०।। जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनातें सदा मुठीं । धरूनि आहाती ।।११।। तेही कीजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ।।१२।। देखें विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनी ।।१३।। तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोटावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ।।१४।।
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर: ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।६१।।
म्हणोनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ।।१५।। तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचें विषयसुखें अंत:करण । झकवेना ।।१६।। जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ।।१७।। ये-हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ।।१८।। जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासि ।।१९।। तैसी  या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजातां ।।३२०।।
ध्यायतो विषयान्पुंस:  सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते ।।६२।।
क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।६३
जरी हृदयी विषय स्मरती । तरी निःसंगाही आपजे संगती । संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ।।२१।। जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ।।२२।। संमोहा जालियां व्यक्ती । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ।।२३।।  कां अस्तमानीं निशि । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं प्राणियांसी ।।२४।। मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ।।२५।। जैसें जात्यंधा पळणी पावे । मग तें काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धीसि होती भवे । धनुर्धरा ।।२६।। ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ।।२७।। चैतन्याचा भ्रंशी । शरीरा दशा जैसी । तैसी पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ।।२८।। म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ।।२९।। तैसें विषयांचे ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हे पतन । गिंवसीत पावे ।।३३०।।
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।६४।।
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावें । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ।।३१।। पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ।।३२।। जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ।।३३।। तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ।।३४।। तरी विषयांतही कांही । आपणपेंवांचुनि नाहीं । मग विषय कवण कायीं । बाधितील कवणा ।।३५।। जरी उदके उदकी बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगें आप्लविजे । परीपूर्ण तो ।।३६।। ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखिळ । तयाची प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ।।३७।।
प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते ।।६५।।
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदु:खा ।।३८।। जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ।।३९।। तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दु:ख कैचें कें आहे । तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ।।३४०।। जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ।।४१।।
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयत: शान्तिरशान्तस्य कुत:सुखम् ।।६६।।
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंत:करणीं । तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ।।४२।। तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ।।४३।। निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ।।४४।। आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाचां ठायी । मोक्षु न वसे ।।४५।। देखें आग्निमाजीं घापती । तिये बीजें जरी विरूढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।।४६।। म्हणोनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दु:खाचें । या कारणें इंद्रियांचें दमन निकें ।।४७।।
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ।।६७।।
ये इंद्रियें जें जें म्हणती । ते तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ।।४८।। जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ।।४९।। तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला जाण दु:खें । सांसारिकें ।।३५०।।
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश: ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।६८।।
म्हणोनि आपुलीं आपणपेयां । जरी ये इंद्रियें येती आया । तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे ।।५१।। देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । नातरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ।।५२।। तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।।५३।। आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह । अर्जुना तुज सांगेन । परिस पां ।।५४।।
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने: ।।६९।।
देखें भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें । आणि जीव जेथ चेंइले । तेथ निद्रितु जो ।।५५।। तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ।।५६।।
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप: प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ।।७०।।
पार्था आणिकही परी । तो जाणों येईल अवधारीं । जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ।।५७।। जऱही सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तऱही अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ।।५८।। ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ।।५९।। तैसा प्राप्तीं ऋद्धि सिद्धि । तयासी क्षोभु नाहीं बुद्धी । आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ।।३६०।। सांगें सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ।।६१।। देखे ऋद्धि सिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ।।६२।। जो आपुलेनि नागरपणे । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केविं रंजे पालिवणें । पल्लवांचेनि ।।६३।। जो अमृतासि ठि ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ।।६४।। पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं । तेथ ऋद्धिसिद्धी कायी । प्राकृता होती ।।६५।।
विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: ।
निर्ममो निरहंकारः  स शान्तिमधिगच्छति ।।७१।।
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ।।६६।। तो अहंकारातें दंडूनि । सकळ कामू सांडोनि । विचरे विश्व होऊनि । विश्वाचीमाजीं ।।६७।।
एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।।७२।।
हे ब्रह्मस्थिति नि:सीम । जे अनुभवितां निष्काम । पातले परब्रह्म । अनायासें ।।६८।। जे चिद्रूपीं मिळतां । देहांतींची व्याकुळता । आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ।।६९।। तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ।।३७०।। ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें । आतां आमुचिया काजा आलें । उपपत्ती इया ।।७१।। जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें । तरी पारुषलें म्यां झुंजावे । म्हणूनियां ।।७२।। ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला । आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ।।७३।। तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ।।७४।। जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु । ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ।।३७५।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ।।२।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा समाप्त
(श्लोक : ७२; ओव्या : ३७५)


।। पुंडलिक वरदाऽऽहरी विठ्ठल श्रीऽऽज्ञानदेव तुकाऽऽराम ।।