Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय सातवा ।।

संपादक : आचार्य विराज शांताराम

 
श्रीभगवानुवाच
मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं  मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।१।।
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।२।।
आइका मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु । पै गा तूं योगयुक्त । जालासि आतां ।।१।। मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ।।२।। एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ।।३।। मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ।।४।। तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयाचां ।।५।। अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ।।६।। आतां अज्ञान अवघें हरपें । विज्ञान नि:शेष करपें । आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाईजे ।।७।। ऐसें वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ । जेणें थोडेन पुरें कोड । बहुत मनींचें ।।८।। जेणें सांगतयाचें बोलणें खुंटें । ऐकतयाचें व्यसन तुटें । हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ।।९।।
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।३।।
पैं गा मनुष्यांचिया सहस्रशां- । माजि विपाइलेयाची येथ धिंवसा । तैसेया धिंवसेकरां बहुवसां- । माजि विरळा जाणे ।।१०।। जैसा भरलेया त्रिभुवना- । आंतु एक एकु चांगु अर्जुना । निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ।।११।। कीं तयाहीपाठी । जे वेळीं लोह मांसातें घांटी । ते वेळीं विजयश्रीयेचां पाटीं । एकुचि बैसें ।।१२।। तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताति  कोटिवरी । परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ।।१३।। म्हणऊनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडील गोठी गा आहे । परी तें बोलों येईल पाहें । आता प्रस्तुत ऐकें ।।१४।।
भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।।
तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ।।१५।। आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ।।१६।। हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ।।१७।। आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ।।१८।।
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।५।।
आणि या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ।।१९।। जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी । मनाकरवीं मानवी । शोक मोहो ।।२०।। पैं बुद्धिचां अंगीं जाणणें । तें जियेचिये जवळिकेचें करणें । जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ।।२१।।
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभव: प्रलयस्तथा ।।६।।
ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे । तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ।।२२।। चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा । मोला तरी सरिसा । परी थरचि आनान ।।२३।। होती चौ-यांसी लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा । भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ।।२४।। ऐसें एकतुकें पांचभौतिक । पडती बहुवस टांक । मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ।।२५।। जें आंखूनि नाणें विस्तारी । पाठीं तयांची आटणी करी । माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ।।२६।। हें रूपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों । तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ।।२७।। आणि प्रकृति तंव माझां ठायीं । बिंबे येथ आन नाहीं । म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ।।२८।।
मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।७।।
हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहातां येइजे मूळ । तैं रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ।।२९।। तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ।।३०।। ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजीवडे असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ।।३१।। सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचां सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ।।३२।।
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।८।।
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।९।।
म्हणोनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु । शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ।।३३।। तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीचां ठायीं गंधु । गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ।।३४।। नराचां ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । तें पौरुष मीं हें तत्त्व । बोलिजत असे ।।३५।। अग्नी ऐसें आहाच । तेजा नामाचें आहे कवच । तें परौतें केलिया साच । निजतेज तें मी ।।३६।। आणि नानाविध योनि । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्ततें आहाति जीवनीं । आपुलालां ।।३७।। एकें पवनेंचि पीती । एकें तृणास्तव जीती । एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।।३८।। ऐसें भूताप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन । तें आघवा ठायीं अभिन्न । मीचि एक ।।३९।।
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।१०।।
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।।११।।
पैं आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें । जें अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपटींची ।।४०।। जंव हा विश्वाकार असे । तंव जें विश्वाचिसारखें दिसे । मग महाप्रळयदशें । कैसेही नव्हे ।।४१।। ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असे ।।४२।। मग उघड करूनि पांडवा । जैं हें आणिसील सांख्याचिया गांवा । तैं ययाचा उपेगु बरवा । देखसील ।।४३।। परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांचां ठायीं तप । तें स्वरूप माझें ।।४४।। बळियांमाजीं बळ । तें मी जाणे अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि ते मी ।।४५।। भूतांचां ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरू होय ।।४६।। ये-हवीं विकाराचेनि  पैसें । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसें । परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ।।४७।। जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ।।४८।। कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसारु भोगी ।।४९।। जो श्रुतिगौरवाचां मांडवीं । कामसृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसी पालवी । अपवर्गीं टेके ।।५०।। ऐसा नियतु कां कंदर्पु । जो भूतां यां बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ।।५१।। हें एकैक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणावें । विकरलें असे ।।५२।।
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ।।१२।।
जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळख तूं ।।५३।। हे जाले तरी माझांठायीं । परी ययांमाजीं मी नाही । जैसी स्वप्नींचां डोहीं । जागृती न बुडे ।।५४।। नातरी रसाचीचि सुघट । जैसी बीजकणिका तरी घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ।।५५।। मग तया काष्ठाचां ठायीं । सांग पां बीजपण असे काई । तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसें ।।५६।। पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।।५७।। मग तया उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ।।५८।। सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नी आहे । तैसा विकारू हा मी नोहें । जरीं विकारला असें ।।५९।।
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ।।१३।।
परी उदकीं जाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ।।६०।। हां गा स्वप्न हे लटिकें म्हणों ये । परी निद्रावशें बाणलें होये । तंव आठव काय देत आहे । आपणपेयां ।।६१।। हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे । तेणें देखणेंपण डोळ्यांचें । न गिळिजे कायि ।।६२।। तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ।।६३।। म्हणऊनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती । जैसीं जळींची जळीं न विरती । मुक्ताफळें ।।६४।। पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मिळविजे । ए-हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ।।६५।। तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परी मायायोगें जीव- । दशे आले ।।६६।।  म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांतीं । विषयांध झाले ।।६७।।
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।।१४।।
आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होइजे हें आया । कैसेनि ये ।।६८।। जिये ब्रह्माचळाचां आधाडां । पहिलिया संकल्पजळाचा उभाडा । सवेंचि महाभूतांचा बुडबडा । साना आला ।।६९।। जे सृष्टीविस्ताराचेनि वोघें । चढत काळकलनेचेनि वेगें । प्रवृत्ति निवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ।।७०।। जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापुरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांची ।।७१।। जे द्वेषाचां आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजीं प्रमदादि तळपत । महामीन ।।७२।। जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं बोभाणें । वरी तरताती वोसाणें । सुखदु:खांचीं ।।७३।। रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघाटा । सैंघ दिसे ।।७४।। अहंकाराचिया चळिया । वरी मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मींचिया आकळिया । उल्लाळे घेती ।।७५।। उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ।।७६।। सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविषें । तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ।।७७।। भ्रांतीचेनि खडुळें । रेवलें आस्थेचें अवगाळें । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ।।७८।। तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ।।७९।। पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ।।८०।। तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरती वोेभाणें । ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ।।८१।। येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें ऐक ।।८२।। एक स्वयंबुद्धीचां बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचां डोहीं । गर्वेंचि गिळिले ।।८३।। एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाचां तोंडीं । सगळेचि गेले ।।८४।। एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथाचिये कांसे लागले । ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ।।८५।। आतां वृद्धाप्याचिया तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेणें कवळिजताति पैं गा । चहूंकडे ।।८६।। आणि शोकाचां कडा उपडत । क्रोधाचां आवर्तीं दाटत । आपदागिधीं चुंबिजत । उधवला ठायीं ।।८७।। मग दु:खाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचे रेवें रेवले । ऐसे कामाचिये कांसे लागले । ते गेले वायां ।।८८।। एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं । तें स्वर्गसुखाचां कपाटीं । शिरकोनि ठेले ।।८९।। एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा । परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांचां ।।९०।। जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा नलगे । वरी कांही तरों ये योगें । तरी विपाये तो ।।९१।। ऐसें जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें उतरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ।।९२।। जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसि दुर्जनाची बुद्धी । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ।।९३।। जरी चोरा सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ।।९४।। पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ।।९५।। म्हणऊन गा पंडुसता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैसी मायामय हे सरिता । न तरवे जीवां ।।९६।। येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले । तयां ऐलीच थडीये सरलें । मायाजळ ।।९७।। जयां सद्गुरु  तारूं पुढे । जे अनुभवाचे कासे गाढे । जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ।।९८।। जे अहंभावाचें ओझें सांडूनि । विकल्पाचिया झुळका चुकाऊनि । अनुरागाचा निरुता होऊनि । पाणिढाळु ।।९९।। जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैलतीरा । झेंपावले जे ।।१००।। ते उपरतीचां वांवीं सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।।१।। येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परी ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ।।२।।
न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।१५।।
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।१६।।
जे बहुतां एकां अवांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणोनि विसरु । आत्मबोधाचा ।।३।। ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवें । पुढीले अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जें न करावें । वेदु म्हणे ।।४।। पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ।।५।। इंद्रियग्रामींचां राजबिदीं । अहंममतेचिया जल्पवादीं । विकारांतरांची मांदी । मेळविताती ।।६।। दु:खशोकाचां घार्इं । मारिलीयाची सेचि नाहीं । हें सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ।।७।। म्हणोनि ते मातें चुकले । आइकां चतुर्विध मज भजले । जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ।।८।। तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासू बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ।।९।।
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।१७।।
तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयाचिलागीं भजे । तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ।।११०।। मग चौथियाचां ठायीं । कांहींचि करणें नाहीं । म्हणोनि भक्तु एकु पाहीं । ज्ञानिया जो ।।११।। जें तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदाचें कडवसें । मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेविंचि ।।१२।। परी आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ।।१३।। जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेविं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ।।१४।। जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । ये-हवीं गगन तो सहजें । असे जैसें ।।१५।। तैसें शरीरें हन कर्में । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरें प्रतीतिधर्में । मीचि जाहला ।।१६।। आणि ज्ञानाचेनि उजिडलेंपणें । मी आत्मा ऐसें तो जाणे । म्हणऊनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ।।१७।। हां गा जीवापैलीकडिलिये खुणें । जो पावोनि वावरोंही जाणे । तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ।।१८।।
उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ।।१८।।
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभें । मज आवडे तोहि भक्त झोंबे । परी मीचि करीं वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।।१९।। पाहें पां दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करिताहे फांसा । परी दोरेंवीण कैंसा । वत्साचा बळी ।।१२०।। कां जें तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणें । देखे तयातें म्हणे । हे मायचि कीं माझी ।।२१।। तें येणें मानें अनन्यगती । म्हणूनि धेनूहि तैसीचि प्रीती । यालागीं लक्ष्मीपति । बोलिले साच ।।२२।। हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितलें ।।। तेही भक्त भले । पढियंते आम्हां ।।२३।। परी जाणोनियां मातें । जे पाहों विसरला माघौतें । जैसें सागरा येऊनि सरिते । मुरडावें ठेलें ।।२४।। तैसी अंत:करणकुहरीं उपजली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली । तो मी हें काय बोलीं । फार करूं ।।२५।। ये-हवीं ज्ञानिया जो म्हणिजे ।  तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परी काय कीजे । न बोलणें बोलों ।।२६।।
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ।।१९।।
जे तो विषयांची मोट झाडी । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावूनि आला पाडीं । सद्वासनेचिया ।।२७।। मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृतीचा अव्हांटा । डावलूनि ।।२८।। आणि जन्मशतांचां वाहतवणा । तेविंचि आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ।।२९।। ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट जाली ।।१३०।। तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची ओतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।।३१।। ते वेळी जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे । अथवा निवांत जरी राहे । त-ही मीचि तया ।।३२।। हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं । जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ।।३३।। तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतु बाहेरी । हें सांगिजे बोलवरी । तैसें नव्हे ।।३४।। म्हणोनि असो हें इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ।।३५।। हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ।।३६।। जयाचिये प्रतीतीचा वाखौरां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ।।३७।। येर बहु जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टीं- । मंद जाले ।।३८।।
कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ।।२०।।
आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा झाला रिगावा । कीं तयाचिये  घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ।।३९।। ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरा ।।१४०।। आधींच प्रकृतीचे पाईक । वरी भोगालागीं तंव रंक । मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ।।४१।। कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधि । विहित करणें ।।४२।।
यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।२१।।
पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ।।४३।। देवोदेवीं मीचि पाहीं । हाही निश्चय त्यासि नाहीं । भाव ते ते ठायीं । वेगळाला धरी ।।४४।।
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ।।२२।।
मग श्रद्धायुक्त । तेथिंचे आराधन जें उचित । तें सिद्धिवरी समस्त । वर्तों लागे ।।४५।। ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ।।४६।।
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ।।२३।।
परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ।।४७।। किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ।।४८।। हें असो परौतें । मग हो कां आवडे तें । परी यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ।।४९।। येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं । ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ।।१५०।।
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।।२४।।
परी तैसें ते न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । पै पोहताति पाणियें । तळहातिंचेनि ।।५१।। नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ।।५२।। हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।।५३।। तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनियां धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं चिदंबरा ।। गोसाविया नोहावें ।।५४।। जेथ उंचावतेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ।।५५। तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ।।५६।। परी हा बोल आघवा । जरी विचारिजतसे पांडवा । तरी विशेषें या जीवा । न चोजवे गा ।।५७।।
नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।।२५।।
कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेनिही देहबळें । न देखती माते ।।५८।। ये-हवीं मी नसें ऐसें । काही वस्तुजात असे । पाहें पां कवण जळ रसें- । रहित आहे ।।५९।। पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एक मीचि । विश्वीं असे ।।१६०।।
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।२६।।
येथें भूते जियें अतीतलीं । तियें मीचि होऊन ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ।।६१।। भविष्यमाणें जियें हीं ।  तींही मजवेगळीं नाहीं । हा बोलचि ये-हवीं  कांहीं । होय ना जाय ।।६२।। दोराचिया सापासी । डोंबा बडि ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेविं भूतांसि मिथ्यत्वें ।।६३।। ऐसा मी पंडुसुता । अनस्यूत सदा असतां । यां संसार जो भूतां । तो आनें बोलें ।।६४।। आता थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसीं । जैं अहंकारतनूंसी । वालभ पडिलें ।।६५।।
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ।।२७।।
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसी मांडिली । वराडिक ।।६६।। तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ।।६७।।  जो धृतीसि सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु । आशारसें दोंदिलु । जाला सांतां ।।६८।। असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनि धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीसी असे ।।६९।। तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे ।।१७०।। तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादु:खाचां घेतलीं । दांडेवरी ।।७१।।
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता: ।।२८।।
ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणें । जे मतिभ्रमाचें पासवणें । घेतीचिना ।।७२।। उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकांची सांडिली । अटवी जिहीं ।।७३।। मग पुण्याचे धांवा  घेतले । आणि माजी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ।।७४।।
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ।।२९।।
ये-हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयाची ।।७५।। तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे । जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ।।७६।। ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे मन ।।७७।। ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमीं मी ।।७८।। तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ।।७९।।
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ।।३०।।
जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवातें । शिवतलें गा ।।१८०।। जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगें । ते तनूचेनि वियोगें । विरहे नव्हती ।।८१।। ये-हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ।।८२।। परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माजिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ।।८३।। ये-हवीं तरी जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंत:करण- । युक्त योगी ।।८४।। तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ।।८५।।  जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जियें नानार्थरसें रसाळें । बहुकाते आहाति परिमळें । भावाचेनि ।।८६।। सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाचीं वचनफळें । अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिली ।।८७।। तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाचां सागरीं चुबुकळिलीं । मग तैसींच कां घोळिलीं । परमानंदें ।।८८।। तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ।।८९।। तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचां जीवीं गुतकुलिया । होत आहाती ।।१९०।। ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ।।९१।। झाकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहिलीं ।।९२।। तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांही दशनीं न फुटती । ऐसें जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ।।९३।। मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारांगणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ।।९४।। इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मती बुडलिया । थाव न निघे ।।९५।। वांचूनि जाणावयाची कें गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिये पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ।।९६।। मग विनविलें सुभटें । हां हो जी यें एकवाटे । सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ।।९७।। ये-हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचे उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोलों लाहाति ।।९८।। परी तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ।।९९।। कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचें रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ।।२००।। तेविंचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहें । किजो देवा ।।१।। ऐसा मागील पडताळा घेऊनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविंचि माजीं शिरऊनि । आर्ती आपुली ।।२।। कैसी पुसती पाहें पां जाणीव । भिडेची तरी लंघों नेदी शीव । ये-हवीं कृष्णहृदयासी खेंव । देवों सरला ।।३।। अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें । हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ।।४।।  आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ हरीचें बोलणें । हें संजयो आवडलेपणें । सांगेल कैंसें ।।५।। तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मऱ्हाटी । जैसी कानाचे आधीं दृष्टी । उपेगा जाये ।।६।। बुद्धिचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा । अक्षरांचियाचि भांबा । इंद्रियें जिती ।।७।। पाहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें । परी वरचिली बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ।।८।। तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गांवां । लेसा जाईजे ।।९।। ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ।।२१०।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय: ।।७।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा समाप्त ।। (श्लोक ३०, ओव्या २१०)

।। पुंडलिक वरदाऽ हरि विठ्ठऽल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।