Sunday, 17 April 2016

।। ज्ञानेश्वरी ।। अध्याय पहिला ।।

 संपादक : आचार्य विराज शांताराम
 
ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।१।। देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।२।। हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।।३।। स्मृति तेचि अवयव । देखा आंगिक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।।४।। अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांची ।।५।। पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ।।६।। देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ।।७।। नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ।।८।। तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लव सडका ।।९।। देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ।।१०।। तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।। एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ।।१२।। मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ।।१३।। देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।।१४।। तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ।।१५।। मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी। अली सेविती ।।१६।। प्रमेय प्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसे एकवटती इभ-। मस्तकावरी ।।१७।। उपरी दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें कुसुमें मुकुटी सुगंधें । शोभती भलीं ।।१८।। अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ।।१९।। हे तिन्ही एकवटले । तेथे शब्दब्रह्म कवळलें । ते मियां गुरुकृपा नमिलें । आदिबीज ।।२०।। आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।।२१।। मजहृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु । म्हणऊनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ।।२२।। जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ।।२३।। कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ।।२४।। म्हणोनि जाणतेनों गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होइजे । जैसें मूळसिंचने सहजें । शाखा पल्लव संतोषती ।।२५।। कां तीर्थे जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं । नातरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ।।२६।। तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि । अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ।।२७।। आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ।।२८।। नातरी सर्वसुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ।।२९।। कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । शास्त्रजातां वरिष्ठ । अशेषांचें ।।३०।। नातरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदेचें ।।३१।। नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्करोनी महामती । व्यासाचिये ।।३२।। म्हणोनि हा काव्यां रावो । ग्रंथगुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ।।३३।। तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ।।३४।। एथ चातुर्य शाहणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ।।३५।। माधुर्यीं मधुरता । श्रृंगारीं सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ।।३६।। एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा । म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ।।३७।। आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळिक । गुणा सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ।।३८ भानुचेनी तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । तैसें व्यासमती कवळिलें । मिरवे विश्व ।।३९।। कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।४०।। नातरी नगरांतरी वसिजे । तरी नागरचि होईजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळित सकळ ।।४१।। कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ।।४२।। नातरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासोनि अपाडें । जियापरी ।।४३।। नाना घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण । मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी ।।४४।। तैसें व्यासोक्तिं अळंकारिले । आवडे तें बरवेपण पातलें । ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासीं ।।४५।। नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि अंगी । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ।।४६।। म्हणऊनि महाभारतीं जे नाही । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ।।४७।। ऐसी जगीं सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ।।४८।। जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरूपम । परम मंगळधाम । अवधारिजो ।।४९।। आतां भारती कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसीं ।।५०।। नातरी शब्दब्रह्माब्धि । मथिलेया व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि । नवनीत हें ।।५१।। मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलें विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ।।५२।। जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ।।५३।। जें आकर्णिजे भक्तीं । जे आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वीं संगती । सांगिजैल ।।५४।। जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेसी ।।५४।। जैसें शारदीयेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ।।५६।। तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपणा चित्तां आणूनियां ।।५७।। हें शब्देवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे प्रमेयासी ।।५८।। जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ।।५९।। कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रगटता । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ।।६०।। ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलेनि अंत:करणें । आथिला तोचि जाणे । मानूं इये ।।६१।। अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ।।६२।। हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ।।६३।। जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोलें जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ।।६४।। तैसा तुम्हीं मी आंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ।।६५।। परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थु कवळूं पाहें । तें अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ।।६६।। हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । ये-हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ।।६७।। कीं टिटिभू चांचूवरी । माय सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें एथ ।।६८।। आइका आकाश गिंवसावें । तरी आणिक त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारितां ।।६९।। या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ।।७०।। तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे गीतातत्त्व ।।७१।। हा वेदार्थसागरु । जया निद्रिताचा घोरु। तो स्वयें श्रीसर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ।।७२।। ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ।।७३।। हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ।।७४।। परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोलें मी सधरु । जैं सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ।।७५।। ये-हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । त-ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ।।७६।। लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ।।७७।। जरी प्रकटे सिद्धसरस्वती । त-ही मुकया आथी भारतीं । एथ वस्तुसामर्थ्यशक्ती । नवल कायी ।।७८।। जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणऊनि मी प्रवार्तों लाहें । ग्रंथीं इये ।।७९।। तरी न्यून तें पुरतें । अधिक तें सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असें ।।८०।। आतां देइजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसें चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ।।८१।। तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरुपितु । ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ।। ८२।। तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हें तुज बोलावें नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देर्इं । झडकरी वेगां ।।८३।। या बोला निवृत्तिदासु पावूनि परम उल्हासु । म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ।।८४।।
धृतराष्ट्र उवाच :
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ।।१।।
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगें मातु । कुरुक्षेत्रींची ।।८५।। जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनि ।।८६।। तरी तिहीं येतुला अवसरी । काय किजतु असे येरयेरी । तें झडकरी कथन करीं । मजप्रती ।।८७।।
संजय उवाच :
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ।।२।।
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ।।३।।
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ।।८८।। तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसें उसळलें काळकूट । घरी कवण ।।८९।। नातरी वडवानलु सांदुकला । प्रलयवातें पोखला । सागर शोषूनि उधवला । अंबरासी ।।९०।। तैसें दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । अवगमलें भयासुर । तिये काळीं ।।९१।। तें देखोनि दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें । जैसें न गणिजे पंचाननें । गजघटांतें ।।९२।। मग द्रोणापासीं आला । तयातें म्हणे हा देखिला । कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ।।९३।। गिरिदुर्ग जैसें चालते । तैसे विविध व्यूह सभंवते । हे रचिले आथि बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ।।९४।। जो कां तुम्ही शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ।।९५।।
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ।।४।।
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । क्षात्रधर्मी निपुण । वीर आहाती ।।९६।। जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें प्रसंगेंचि ।।९७।। एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ।।९८।।
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ।।५।।
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा: ।।६।।
चेकितान धृष्टकेतु । काशीश्वरु विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ।।९९।। हा कुंतिभोजु पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादी राय हे । सकळ देख ।।१००।। हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ।।१।। आणिकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ।।२।।
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ।।७।।
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय:
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ।।८।।
आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक । ते प्रसंगें आईक सांगिजति ।।३।। उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जे ।।४।। हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ।।५।। या एकेकाचेनिं मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे । हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ।।६।। एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा अडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ।।७।। समितिंजयो सौमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती । जयांचिया बळा मिती । धाताही नेणे ।।८।।
अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता:
नानाशस्त्रप्रहरणा: सर्वे युद्धविशारदा: ।।९।।
जे शस्त्रविद्या पारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ ।।९।। हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु आंगीं । परी सर्व प्राणें मजचिलागीं । आरायिले असती ।।११०।। पतिव्रतेचें हृदय जैसें । पतीवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ।।११। आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें । ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ।।१२।। झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती । हें बहु असो क्षात्रनीति। एथोनियां ।।१३।। ऐसे सर्वांपरी पुरते । वीर दळीं आमुतें । आतां काय गणूं यांते । अपार हें ।।१४।।
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।१०।।
वरी क्षत्रियांमाजीं श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं ।।१५।। आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें । येणें पाडे थेंकुलें । लोकत्रय ।।१६।। आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं । मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ।।१७।। नातरी प्रलयवन्हि महावातु । या दोघां जैसा सांघातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ।।१८।। आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोडें । ओइचलेनि पाडें । दिसत असे ।।१९।। वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली तेणें ।।१२०।।
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता: ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त: सर्व एव हि ।।११।।
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें । आतां दळभार आपुलाले । सरसे करा ।।२१।। जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथिया ।।२२।। तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ।।२३।। हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ।।२४।।
तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह: ।
सिंहनादं विनद्योच्चै: शंखं दध्मौ प्रतापवान् ।।१२।।
या राजाचिया बोला । सेनापती संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ।।२५।। तो गाजत असे अद्भुतु । दोन्हीं सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ।।२६।। तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ।।२७।। ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां ।।२८।। घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ।।२९।। तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तंव दळामाजीं रणतुरें आस्फुरिलीं ।।१३०।।
तत: शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा: ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ।।१३।।
उदंड सैंध वाजतें । भयानकें खाखातें । महाप्रळयो जेथें । धाकडांसी ।।३१।। भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ।।३२।। आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैल हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ।।३३।। तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ।।३४।। एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ।।३५।। ऐसा अद्भुत तुरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ।।३६।।
तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु: ।।१४।।
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजय: ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर: ।।१५।।
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: ।
नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।।१६।।
ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तंव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ।।३७।। हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चा-ही ।।३८।। कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ।३९।। जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णुं ।।१४०।। ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु । सारथी शारंगधरु । अर्जुनेसी ।।४१।। देखा नवल तया प्रभूचे । प्रेम अद्भुत भक्तांचे । जे सारथ्य पार्थाचें । करीतु असे ।।४२।। पाइकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला । तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ।।४३।। परी तो महाघोषु थोरु । गर्जत असे गंहिरु । जैसा उदैला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ।।४४।। तैसे तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ।।४५।। तैसाचि देखें येरें । निनादें अति गहिरें । देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ।।४६।। ते दोनी शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ।।४७।। तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौंड्र आस्फुरिला महाशंखु ।।४८।। तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ।।४९।। नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ।।१५०।।
काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ: ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित: ।।१७।।
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहु: शंखान्दध्मु: पृथक्पृथक् ।।१८।।
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।।१९।।
तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपति देख । महाबाहु ।।५१।। तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्न नृपनाथु । शिखंडी हन ।।५२।। विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ।।५३।। तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें । गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ।।५४।। तेथ तिन्ही लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ।।५५।। पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ।।५६।। सृष्टि गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं ।।५७।। दिहाचि दिन थोकला । जैसा प्रळयकाळ मांडला । तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं ।।५८।। तें देखोनि आदिपुरुष विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु । मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ।।५९।। म्हणोनि विश्व सांवरलें । ए-हवीं युगान्त होतें वोडवलें । जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ।।१६०।। तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ।।६१।। जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ।।६२।। तो गाजत जंव आईकती । तंव उभेचि हियें घालिती । एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ।।६३।।
अथ व्यवस्थितान्दृष्टवा धार्तराष्ट्रान् कपिध्वज: ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव: ।।२०।।
तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ।।६४।। मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।।६५।। तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ।।६६।। ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ।।६७।। तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । मग लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।।६८।।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच :
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।।२१।।
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्यें घालावा दोहीं दळां ।।६९।।
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ।।२२।।
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता: ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव: ।।२३।।
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते जे ।।१७०।। एथ आले असती आघवे । परी कवणेंसीं म्या झुंजावे । हें रणीं लागे पहावें । म्हणऊनियां ।।७१।। बहुतकरूनि कौरव । हे आतुर दु:स्वभाव । वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं ।।७२।। झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ।।७३।।
संजय उवाच :
एवमुक्तोे हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।।२४।।
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला । दोहीं सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ।।७४।।
भीष्मद्रोणप्रमुखत: सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ।।२५।।
तत्रापश्यत्स्थितान्पार्थ: पितॄनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ।।२६।।
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेय: सर्वानबन्धूनवस्थितान् ।।२७।।
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक बहुत आहाति ।।७५।। तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु संभ्रमेंसीं ।।७६।। मग देवा म्हणे देख देख । हे गोत्र गुरु अशेख । तवं कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला ।।७७।। तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हें मनीं धरिलें येणें । परी काहीं आश्चर्य असे ।।७८।। ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थू । परी उगा असे निवांतु । तिये वेळीं ।।७९।। तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ।।१८०।। इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजीं ।।८१।। सुहृज्जन सासरे । आणिकही सखे सोइरे । कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ।।८२।। जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले । हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ।।८३।। ऐसें गोत्रचि दोहीं दळी । उदित जालें असे कळीं । हें अर्जुनें तिये वेळी अवलोकिलें ।।८४।।
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।
तेथ मनीं गजबज जाहाली । आणि आपैसी कृपा उपजली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ।।८५।। जिया उत्तमे कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथि । तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ।।८६।। नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंविण अनुसरे । भ्रमला जैसा ।।८७।। कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्ततासिद्धि । आठवे ना ।।८८।। तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जें अंत:करण दिधलें । कारुण्यासी ।।८९।। देखा मंत्रज्ञु बरळुं जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये । तैसा तो धनुर्धरू महामोहें । आकळिला ।।१९०।। म्हणऊनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळी शिंपिला । सोमकांतु ।।९१।। तयापरी पार्थु । अतिस्नेहे मोहितु । मग सखेद असे बोलतु । अच्युतेसीं ।।९२।।
अर्जुन उवाच :
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ।।२८।।
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।२९।।
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: ।।३०।।
तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ।।९३।। हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केविं होय ।।९४।। येणें नावेंचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ।।९५।। देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसी ।।९६।। सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथे बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।।९७।। तें न धरतचि निष्टलें । परी नेणेंचि हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ।।९८।। जें वज्रापासोनि कठीण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ।।९९।। जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ।।२००।। जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परी कळिकेमाजीं सांपडे । कोंवळिये ।।१।। तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरूं नेणे । तैसे कठीण कोंवळेपणें । स्नेह देखा ।।२।। हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ।।३।। अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ।।४।। कैसी नेणों सदयता । उपनली तेथ चित्ता । मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ।।५।। माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावें हे सकळ । येणें नांवें ।।६।।
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।३१।।
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिकां कां न वधावें । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ।।७।। म्हणोनि जळों हें झुंज । प्रत्यया नये मज । एणें काय काज । महापापें ।।८।। देवा बहुतीपरी पाहतां । येथ वोखटें होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ।।९।।
न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ।।३२।।
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा: सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ।।३३।।
तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । पावोनियां ।।२१०।। या सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ।।११।। तेणें सुखेंवीण होईल । ते भलतेही साहिजेल । वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ।।१२।। परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ।।१३।। तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें । जे वडिलां यां चिंतावें । अहित मनें ।।१४।। पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुलें ।।१५।। हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेंया बोलिजे । वरी घडे तरी कीजे । भलें एयां ।।१६।। आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं यांचां ।।१७।। आम्ही दिगंतींचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ आपुलें जें ।।१८।। तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ।।१९।। अंतोरियां कुमरें सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपूनि ।।२२०।। ऐसियांते कैसेनि मारूं । कवणावरी शस्त्र धरूं । निजहृदया करूं । घातु केवीं ।।२१।।
आचार्या: पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: ।
मातुला: श्वशुरा: पौत्राः श्याला: सम्बन्धिनस्तथा ।।३४।।
हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्मद्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ।।२२।। एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातु केवळ । इष्टही असती ।।२३।। अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि ।।२४।।
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो: किं नु महीकृते ।।३५।।
हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु । परी आपण मनें घातु । न चिंतावा ।।२५।। त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ।।२६।। जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे । सांगें मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा ।।२७।।
निहत्य धार्तराष्ट्रान्न: का प्रीती: स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिन: ।।३६।।
जरी वधु करूनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ।।२८।। कुळहरणीं पातकें । तियें आंगी जडती अशेखें । तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ।।२९।। जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ।।२३०।। सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ।।३१।। तयापरी तूं देवा । मज झकऊं न येसी मावा । जरी पुण्याचा वोेलावा । नाशिजैल ।।३२।।
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिन: स्याम माधव ।।३७।।
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ।।३३।। तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमचे काय उरेल । तेणें दु:खे हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ।।३४।। म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ।।३५।।
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतस: ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ।।३८।।
कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ।।३९।।
हे अभिमानमदें भुलले । ज-ही पां संग्रामा आले । त-हीं आम्हीं हित आपुलें । जाणावें लागें ।।३६।। हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ।।३७।। हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां । तो तंव चुकवितां । लाभु आथी ।।३८।। असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगें ।।३९।। कां समोर अग्नी देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणीं एका कवळूनि । जाळूं सके ।।२४०।। तैसे दोष हे मूर्त । अंगीं वाजों असती पहात । हें जाणतांही केविं एथ । प्रवर्तावें ।।४१।। ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ।।४२।।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।४०।।
जैसें काष्ठे काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलोनि ।।४३।। तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ।।४४।। म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ।।४५।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर: ।।४१।।
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ।।४६।। असता दीपु दवडिजे । मग अंधकारी राहाटिजे । तरी उजूचि कां आडळिजे । जयापरी ।।४७।। तैसा कुळीं कुळक्षयो होये । तये वेळीं तो आद्यधर्मु जाये । मग आन कांही आहे । पापावांचुनी ।।४८।। जै यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती । म्हणऊनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांशी ।।४९।। उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ।। २५०।। जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं प्रवेशती ।।५१।।
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया: ।।४१।।
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथि ।।५२।। देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ।।५३।। जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक कर्म पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ।।५४।। तरी पितर काय करिती । कैसेनी स्वर्गीं वसती । म्हणोनि तेही येती । कुळापासीं ।।५५।। जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ।।५६।।
दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।४३।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।४४।।
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राराज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता: ।।४५।।
देवा अवधारीं आणिक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ।।५७।। जैसा घरीं आपुलां । वानिवसें वन्ही लागला । तो आणिकांही प्रज्वळिला । जाळूनि घाली ।।५८।। तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधु पावती । निमित्तें येणें ।।५९।। तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ।।२६०।। पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ।।६१।। देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ।।६२।। अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं ते तंव क्षणिक । ऐसें जाणतांही दोख । अव्हेरूं ना ।।६३।। जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठीं सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडले आम्हां ।।६४।।
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणय: ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।४६।।
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे शस्त्रें सांडूनि साहावे । बाण यांचे ।।६५।। तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ।।६६।। एसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ।।६७।।
संजय उवाच :
एवमुक्त्वार्जुन: संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस: ।।४७।।
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ।।६८।। मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ।।६९।। जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ।।२७०।। नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतला तापसु भ्रमे । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ।।७१।। तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दु:खें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ।।७२।। मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐके राया वर्तलें । संजयो म्हणे ।।७३।। आतां यावरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणे परी परमार्थु । निरूपील ।।७४।। ते सविस्तर पुढारी कथा । अतिसकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ।।७५।।

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ।।१।।
श्री ज्ञानेश्वरीअध्याय पहिला समाप्त (श्लोक : ४७; ओव्या : २७५)

।। पुंडलिक वरदाऽऽहरी विठ्ठल श्रीऽऽज्ञानदेव तुकाऽऽराम ।।