संपादक : आचार्य विराज शांताराम
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती जो । योगरूप ।।१।। सहजें ब्रह्मरसाचें पारणे । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ।।२।। कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ।।३।। तैसें आम्हा तुम्हां जाहलें । जें आडमुठी तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूंतें ।।४।। तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें अवसरीं आहे घेतलें । कुमरांचिया ।।५।। हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । ए-हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ।।६।। परी तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैसें पाहेल । तेवींचि येरू से घेईल । म्हणोनि बिहे ।।७।। परी आपण चित्तीं आपुलां । निकियापरी संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ।।८।। तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंत:करणें । आतां आदरेसीं बोलणें । घडेल तया ।।९।। तो गीतेमाजीं षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ।।१०।। तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार । नाना योगविभवभांडार । उघडलें कां ।।११।। जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोह पावे ।।१२।। तो अध्याय सहावा। वरी साहित्याचिया बरवा । सांगिजेल म्हणोनि परिसावा । चित्त देउनी ।।१३।। माझा मराठाचि बोलु कौतुकें । परी अमृतातेंही पैजासीं जिंकें । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।।१४।। जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।१५।। ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होती जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।१६।। सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परी रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।१७।। नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ।।१८।। जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें । बोलु भुजाही आविष्करे । आलिंगावया ।।१९।। ऐसीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परी तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ।।२०।। तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।।२१।। हें असो तु यां बोलाची ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ।।२२।। आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ।।२३।। येथ श्रवणाचेनि पांगें -। वीण श्रोतयां व्हावें लागे । हें मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ।।२४।। आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेंसीं सुरवाडिजे । सुखाचिमाजीं ।।२५।। ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । ये-हवी आघवी गोठी होईल । मुकया बहिरयाची ।।२६।। परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें । जे येथ अधिकारिये स्वभावें । निष्कामकाम ।।२७।। जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचूनि एथीची गोडी । नेणती आणिक ।।२८।। जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ।।२९।। तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो । म्हणोनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ।।३०।। परी अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ।।३१।। तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे । परी निवृत्तिकृपादीपउजियेडें । देखेन मी ।।३२।। जें दिठीही न पविजे । तें दिठीवीण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ।।३३।। नातरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हाता ।।३४।। तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणऊनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ।।३५।। तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ।।३६।। आईका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ।।३७।। म्हणोनि तो भगवंतु । जो नि:संगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होर्इं आतां ।।३८।।
श्रीभगवानुवाच
अनाश्रित: कर्मफलं कार्यं कर्म करोति य: ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिय: ।।१।।
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं । येऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही। तंव एकचि ते ।।३९।। सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पहातां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ।।४०।। जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहीं मार्गीं जाणें । एकाचि ठाया ।।४१।। नातरी एकचि उदक सहजें । परी सिनानां घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व हे जाणिजे । योगसंन्यासांचें ।।४२।। आइकें सकळसंमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ।।४३।। जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिचिं तियें बीजें । अपेक्षीना ।।४४।। तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरे । करणें पावे ।।४५।। तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ।।४६।। ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ।।४७।। वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडीण बद्धक । तरी टांकोटाकीं आणिक एक । मांडीचि तो ।।४८।। जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ।।४९।। गृहस्थाश्रमाचें ओझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ।।५०।। म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ।।५१।।
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ।।२।।
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।।५२।। जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटे । साचें जया ।।५३।।
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शम: कारणमुच्यते ।।३।।
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ।।५४।। येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाऊलवाटें । येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ।।५५।। मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाहि पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा। कडेलग ।।५६।। तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखी लागेल ढाळेंढाळें । वैराग्याची ।।५७।। ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ।।५८।। मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ।।५९।। जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ।।६०।। येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांंगेन आइकें ।।६१।।
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ।।४।।
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा। नाहीं विषयांचिया येरझारा। जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ।।६२।। जयाचें सुखदु:खाचेनि आंगें । झगटले मानस चेवो नेघे । विषय पासींही आलियां से न रिघे । हें काय म्हणऊनि ।।६३।। इंद्रियें कर्माचां ठायी । वाढीनलीं परी कहीं । फळहेतूची चाड नाही । अंत:करणीं ।।६४।। असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ।।६५।। तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां । सांगें तया ऐसी हे योग्यता । कवणें दीजे ।।६६।।
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ।।५।।
तंव हांसोनि कृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणे । कवणासि काय दिजेल कवणें । येथ अद्वैतीं इयें ।।६७।। पैं व्यामोहाचिया शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे । ते वेळीं दु:स्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूचां ।।६८।। पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो। ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोही आपणपांचि ।।६९।। म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु किजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ।।७०।।
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित: ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ।।६।।
हा विचारूनि अहंकारू सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ।।७१।। एऱ्हवी कोशकीटकाचिया परी । तो आपणपयां आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळी ।।७२।। कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवां आंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ।।७३।। कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंदु अंत:करणें । घेऊनि ठाके ।।७४।। येऱ्हवीं होय तें तोचि आहे । परी काई कीजे बुद्धि तैसी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ।।७५।। जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोंविन्नली येरी मोहरें । तरी तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ।।७६।। वायांचि मान पिळी । आटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरूनि ठाके ।।७७।। म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ।।७८।। ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधला । मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ।।७९।। म्हणऊनि आपणपयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ।।८०।।
जितात्मन: प्रशान्तस्य परमात्मा समाहित: ।
शीतोष्णसुखदु:खेषू तथा मानापमानयो: ।।७।।
तया स्वांत:करणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दूरी नाहीं ।।८१।। जैसा किडाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोेपीं ।।८२।। हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ।।८३।। तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ।।८४।। आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदु:खाची कडसणी । इयें न समाती कांही बोलणीं । मानापमानाचीं ।।८५।। जे जया वाटा सूर्यु जाये ।। तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणऊनि ।।८६।। देखें मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैसीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हतीं आनें ।।८७।।
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रिय: ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन: ।।८।।
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ।।८८।। आतां व्यापकुं कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैसी । दुजेनवीण ।।८९।। ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके । जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ।।९०।। तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणें सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ।।९१।। देखें सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ।।९२।। पाहातां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनघ्र्य रत्न चोखडें । देखे दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ।।९३।।
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ।।९।।
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेदु विचित्रु । कल्पूं कैंचा ।।९४।। तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।।९५।। मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरिटी । काय परिसाचिया कसवटी । वानिया कीजे ।।९६।। ते जैसी निर्वाण सुवर्णुचि करी । तैसी जयाची बुद्धि चराचरी । होय साम्याची उजरी । निरंतर ।।९७।। जें ते विश्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकेचि भांगारें । परब्रह्में ।।९८।। ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें । म्हणोनि अहाचवाहाचें न झकवें । येणें आकारचित्रें ।।९९।। घापे पटामाजीं दृष्टी । दिसे तंतुची सैंघ सृष्टी । परी तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ।।१००।। ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभवो जयातें असे । तोचि समबुद्धि हें अनारिसें । नव्हे जाणें ।।१।। जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासी ।।२।। जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये । देखें स्वर्गसुखादि इये । खेळु जयाचा ।।३।। विपायें जरी आठवले चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयाते प्रशंसिता । लाभु आथि ।।४।।
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थित: ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रह: ।।१०।।
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपण असे । अखंडित ।।५।। ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ।।६।। ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ।।७।। जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ।।८।। प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न पुरे ।।९।। जयाचेनि आंगिके तेजें । आवो रविशशीचिये वाणिजे । म्हणऊनि जग हें वेसजे- । वीण असे तया ।।११०।। हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसें टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ।।११।। म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों ते ।।१२।। ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुनु पढिये हे गोडी । नासेल हन ।।१३।। म्हणोनि तें तैसें बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ।।१४।। जया सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ।।१५।। विपायें अहंभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ।।१६।। दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । ना तरी दाटूनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ।।१७।। आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ।।१८।। इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ।।१९।। हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ।।१२०।। हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ।।२१।। तैसें जाहलें अनंता । ऐेसें तरी मी न म्हणता । जरी तयाचा न देखता । अतिशयो एथ ।।२२।। पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंझ । परी पुढें वालभाचें भोज । नाचत असे ।।२३।। आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ।।२४।। म्हणऊनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखें शृंगारलिया मानसा। दर्पणु तो ।।२५।। यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ।।२६।। हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका आहे सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ।।२७।। पासींचि गोसावी वर न वानिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुनुचि तो सहजें । पढिये हरी ।।२८।। पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहीहूनि काय न वर्णिजे । पतिव्रता ।।२९।। तैसा अर्जुनूचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जें तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ।।१३०।। जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ।।३१।। तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनि आली ।।३२।। हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचें ।।३३।। कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार । हेचि श्लोकार्थकुमुदि फार । साविया होती ।।३४।। चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ।।३५।। तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ।।३६।। देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ।।३७।। म्हणऊनि बहुदिवस वोळगावा । कां अवसरु पाहोनी विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ।।३८।। हें असो कथा सांगे वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ।।३९।। एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परी तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ।।१४०।। जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होइजेल । काय जाहलें अभ्यासिजेल । सांगाल ते ।।४१।। हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंत:करणी । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ।।४२।। हें अंगें म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हांसोनि कृष्ण हो कां । करूं म्हणती ।।४३।। देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडलिया कवणेकडे । अपुरें असे ।।४४।। तैसा सर्वेश्वरू बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परी कैसा भारें आतला पिकें । दैैवाचेनि ।।४५।। जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांहीं महागु भेटी । तो अधीनु केतुला किरीटी । जें बोलुही न साहे ।।४६।। मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ।।४७।। तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परी उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धिचिया ।।४८।। ये-हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जें सोहंभाव महुरें । मोडोनि आला ।।४९।। म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । ययासि वेळु न लगेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ।।१५०।। म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आता आरंभींच यया फळेल । म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ।।५१।। ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ।।५२।। तेथ प्रवृत्तितरूचां बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गींचा कापडी । महेशु आझुनी ।।५३।। पंै योगिवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाचां पाउलीं । धोरणु पडिला ।।५४।। तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ।।५५।। पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ।।५६।। हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ।।५७।। चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । अव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ।।५८।। निगिजे पूर्वीलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें येथिचें ।।५९।। येणें मार्गें जया ठाया जाईजे । तो गांवो आपणचि होइजे । हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ।।१६०।। तेथ पार्थु म्हणितले देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ।।६१।। तंव कृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें । आम्ही सांगतसों आपैसें । वरी पुशिलें तुवां ।।६२।।
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन: ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ।।११।।
तरी विशेषें आतांचि बोलिजेल । परी तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणोनि तैसें एक लागेल । स्थान पाहावें ।।६३।। जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासि दुणीव चढे । देखिलिया जें ।।६४।। जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ।।६५।। अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ।।६६।। जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाहि आस्था । समूळ होय ।।६७।। स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परी माघौता । निघों विसरे ।।६८।। ऐसे न राहतयातें राहवी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ।।६९।। हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें शृंगारियांहि उपजे । देखत खेंवो ।। १७०।। जें येणें मानें बरवंट । आणि तैसेंचि अति चोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ।।७१।। आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । मैळेचिना ।।७२।। जेथ अमृताचेनी पाडें । मुळेंहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ।।७३।। पाउला पाउला उदकें । परी वर्षाकाळीही चोखें । निर्झरें कां विशेखे । सुलभें जेथ ।।७४।। हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंद झुळके ।।७५।। बहुत करूनि नि:शब्द । दाट न रिघें श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ।।७६।। पाणिलगें हंसे । दोनी चारी सारसें । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ।।७७।। निरंतर नाहीं । तरी आली गेलीं कांहीं । होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणोें ।।७८।। परी आवश्यक पांडवा । ऐसा ठाव जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।।७९।। दोहींमाजीं आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुत करूनि एकांतें । बैसिजे गा ।।१८०।। म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।।८१।। वरी चोखट मृगसेवडी । माजीं धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकुर ।।८२।। सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकेपाडें तैसें । वोजा घालीं ।।८३।। परी सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ।।८४।। म्हणोनि तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो होआवें । आसन ऐसें ।।८५।।
तत्रैकाग्रं मन: कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिय: ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ।।१२।।
मग तेथ आपण । एकाग्र अंत:करण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ।।८६।। तैसे स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे । जंव कठीणपण विरे । अहंभावाचें ।।८७।। विषयांचा विसरू पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ।।८८।। ऐसें ऐक्य हें सहजें । फांवें तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ।।८९।। आतां आंगातें अंग करी । पवनातें पवनुचि वरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ।।१९०।। प्रवृत्ति माघौती मोहरे । समाधि ऐेलाडी उतरे । आघवें अभ्यासूं सरे । बैसत खेंवो ।।९१।। मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी ऊरु या जघनासी । जडोनि घालीं ।।९२।। चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाचां बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ।।९३।। सव्य तें तळीं ठेविजे । तेणे सिवणीमध्यु पीडिजे । वरि बैसे तो सहजें । वामचरणु ।।९४।। गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ।।९५।। माजीं अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहेटिजे वरी आंगें । पेललेनी ।।९६।। उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ।।९७।। मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ।।९८।। अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ।।९९।। ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहटों लागे ।।२००।।
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ।।१३।।
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ।।१।। माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ।।२।। वरचिलें पातीं ढळती । तळींचीं तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ।।३।। दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ।।४।। ऐसें आंतुचां आंतुचि रचे । बाहेरी मागुतीं न वचे । म्हणोनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ।।५।। आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वाट पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ।।६।। मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौती दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षस्थळीं ।।७।। माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जाळंधरू म्हणिपे । पंडुकुमरा ।।८।। नाभी वरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ।।९।। स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानतळवटीं । बंधु पडे किरिटी । वोढियाणा तो ।।२१०।।
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थित: ।
मन: संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पर: ।।१४।।
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।।११।। कल्पना निमे । प्रवृत्ति शमे । आंग मन विरमे । सावियाचि ।।१२।। क्षुधा काय जाहली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ।।१३।। जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ।।१४।। क्षोभलेपणें माजे । उवाइलाठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ।।१५।। मग थांवलि ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ।।१६।। भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्तांचे थारे । उरों नेदी ।।१७।। धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्ज़ा काढी । अस्थिगत ।।१८।। नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ।।१९।। व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ।।२२०।। तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ति करी उजगरा । कुंडलिनीये ।।२१।। नागाचे पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ।।२२।। तैसी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ।।२३।। विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटींव जैशी ।।२४।। तैसी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । ते वज्रासनें चिमुटली । सावध होय ।।२५।। तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ।।२६।। तैसी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ।।२७।। सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ।।२८।। तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाची मिठी । देऊनि घाली ।।२९।। मुखींचां ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगु लागे ।।२३०।। जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाऊस । पाठी एकदोनी घांस । हियांही भरी ।।३१।। मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वींचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ।।३२।। अधार तरी न संडी । परी नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेंशी ।।३३।। अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ।।३४।। मग सप्तधातूंचां सागरीं । तहानेली घोट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ।।३५।। नासापुटौनि वारा । जो जातसें अंगुळें बारा । तो गचिये धरूनि माघारा । आंतु घाली ।।३६।। तेथ अध वरौतें आकुंचे । ऊध्र्व तळौतें खाचे । तया खेंवामाजि चक्रांचे । पदर उरती ।।३७।। येऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथें ।।३८।। आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांही नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ।।३९।। ऐसीं दोनीं भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ।।२४०।। तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ।।४१।। तो आगी आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ।।४२।। मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ।।४३।। इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ।।४४।। मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे । ४५।। बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ।।४६।। तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ।।४७।। तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ।।४८।। तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ।।४९।। तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरें । पांघुरली असे ।।२५०।। जैसी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ती । धरुं नये ।।५१।। तैसा आहाचवरी कोरडा । त्वचेचा असे पातवडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ।।५२।। मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ।।५३।। नातरी संध्यारागिंचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । कीं अंतर्ज्योतिचें लिंग । निर्वाळिलें ।।५४।। कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतिंव । मज पाहतां सावेव । शांतीचि ते ।।५५।। तें आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ।।५६।। तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ।।५७।। हो कां जे शारदियेचिये वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरीं ।।५८।। तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ।।५९।। वृद्धाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ।।२६०।। वयसा तरी येतुलेवरी । येऱ्हवीं बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ।।६१।। कनकद्रुमाचां पालवी । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसी बरवीं । नवीं निघती ।।६२।। दांतही आन होती । परी अपाडें सानेजती । जैसीं दुबाही बैसे पांती । हिरेयांची ।।६३।। माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमाणिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया ।।६४।। करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें । पाखाळीं होती डोळे । काय सांगों ।।६५।। निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैसीं उतटे । शुक्तिपल्लवांची ।।६६।। तैसी पातियांचिये कळविये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे । आधिलीचि परी होये । गगना कळिती ।।६७।। आइकें देह होय सोनियाचें । परी लाघव ये वायूचें । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ।।६८।। मग समुद्रापैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचें ।।६९।। पवनाचा वारिकां वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ।।२७०।। आइकें प्राणाचा हात धरूनि । गगनाची पाऊटी करूनि । मध्यमेचेनि दादरेहुनी । हृदया आली ।।७१।। ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ।।७२।। जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमी ।।७३।। हें असो ते कुंडली । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचां बोली । चावळे ते ।।७४।। शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें आलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ।।७५।। घोषाचां कुंडीं । नादचित्रांची रूपडीं । प्रणवाचियां मोडी । रेखिली ऐसीं ।।७६।। हेंचि कल्पावेंं तरी जाणिजे । परी आतां कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ।।७७।। विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुमे ।।७८।। तया अनाहताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानीचें बेगें । फिटलें सहजें ।।७९।। आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्यें आधातुरें । करूनि असिजे ।।२८०।। तया हृदयाचां परिवरी । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ।।८१।। बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ।।८२।। ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळी कैसी गमली । म्हणावी पां ।।८३।। हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ।।८४।। नातरी वारयाचेनि अंगे झगटली । दीपाची दिठी निमटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ।।८५।। तैसी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे सोनियाची जैसी सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ।।८६।। मग तिये हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तिचिमाजीं ।।८७।। तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । येऱ्हवीं तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नादबिंदु नेणिजे । कलाज्योती ।।८८।। मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु । ध्यानाचा आदरु । नाहीं परी ।।८९।। हे कल्पना घे सांडी । ते नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ।।२९०।। पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परी दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ।।९१।। तया ध्वनिताचें केणें सोडूनि । यथार्थाची घडी झाडूनि । उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ।।९२।।
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानस: ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ।।१५।।
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहाचें रूप हारपें । मग तो डोळियांची माजि लपें । जगाचिया ।।९३।। येऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी असे । परी वायूचें का जैसें । वळिलें होय ।।९४।। ना तरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा । कां अवयवचि नभा । निवडला तो ।।९५।। तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।। हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ।।९६।। देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये । हे अणिमादिक ।।९७।। परी तेणें काय काज आपणपयां । अवधारीं ऐसा धनंजया । लोपु आथी भूतत्रया । देहींचा देहीं ।।९८।। पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ।।९९।। पाठीं आपण एकला उरे । परी शरीराचेनि अनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ।।३००।। ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसे नाम होये । परी शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ।।१।। मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ।।२।। ते ओंकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ।।३।। पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरीं । भरती गमे सागरीं । सरिता जैसी ।।४।। मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोहंभावाचिया बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ।।५।। तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटे । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ।।६।। पैं मेघाचेनि मुखी निवडला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेयां ।।७।। तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ।।८।। आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐसिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।।९।। गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।।३१०।। म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।।११।। अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी। ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।।१२।। भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ।।१३।। पाठीं तेथेंचि तो भासळला । तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाही बरी आटु भविन्नला । आकाशाचा ।।१४।। आतां महाशून्याचां डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ।।१५।। म्हणूनि आखरामाजीं सांपडे । कीं कानावरी जोडे । हें तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ।।१६।। जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ।।१७।। पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ।।१८।। ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ।।१९।। जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।।३२०।। जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले ।।२१।। जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचे केवळ । चैतन्य गा ।।२२।। जें महाभूतांचे बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ।।२३।। तें हें चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ।।२४।। तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले ते पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरी ।।२५।। आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीर जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ।।२६।। परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।।२७।। जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ।।२८।। कां जे आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ।।२९।। इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ।।३३०।। देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केविं ।।३१।। म्हणऊनि एथ कांही । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देर्इं । बोला एका ।।३२।। आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परी न शकें करूं पांगु । योग्यतेचा ।।३३।। सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाचि जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ।।३४।। नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ।।४५।। जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देईजो ।।३६।। हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्ही निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ।।३७।। कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं । तेथ कृष्ण म्हणती तरी काई । धनुर्धरा ।।३८।। हें काज कीर निर्वाण । परी आणिकही जें कांहीं साधारण । तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धी जाय ।।३९।। पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीचि अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभीं फळें ।।३४०।। तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं । आणि योग्यांची काई । खाणी असे ।।४१।। नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु । तरी तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ।।४२।। येतुलालिये आयणीमाजीं येवढें । योग्यपण तुंतेंही जोडे । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ।।४३।। मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ।।४४।।
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत: ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ।।१६।।
जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसि जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ।।४५।। अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारूनियां ।।४६।। निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मग योगु कवणाचा ।।४७।। म्हणोनि अतिशयें विषय सेवावा । तैसा विरोध न व्हावा । कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ।।४८।।
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा ।।१७।।
आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजें । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ।।४९।। मपितला बोली बोलिजे । मितला पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ।।३५०।। जागणें जरी जाहालें । तरी व्हावें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ।।५१।। ऐसें युक्तीचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ।।५२।।
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निस्पृह: सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ।।१८।।
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत आंत सुख वाढे । तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ।।५३।। जैसें भाग्यचिये भडसें । उद्यमाचेनि मिषें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ।।५४।। तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ।।५५।। म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गींचिये राणिवा । अळंकरिजे ।।५६।।
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मन: ।।१९।।
युक्ति योगाचें अंग पावे । ऐसें प्रयाग होय जे बरवें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ।।५७।। तयातें योगयुक्त म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ।।५८।। आतां तुझे मनोगत जाणोनी । कांहीं एक आम्ही म्हणोनी । तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ।।५९।। तूं प्राप्तीची चाड वाहसी । परी अभ्यासु दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ।।३६०।। तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल इये दुर्जनें । इंद्रियें करिती ।।६१।। पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ।।६२।। ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखें । येऱ्हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ।।६३।।
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ।।२०।।
सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वत: ।।२१।।
म्हणोनि आसनाचिया गाढिका । जो आम्ही अभ्यासु सांगितला निका । तेणें होईल तरी हो कां । निरोधु ययां ।।६४।। येऱ्हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदान लागे । तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ।।६५।। परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियातें आपण देखे । देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ।।६६।। तिये वोळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । चित्तपण समरसें । विरोनि जाय ।।६७।। जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं । तें आपणचि आपुलया ठायीं । होऊनि ठाके ।।६८।।
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत: ।
यस्मिन्स्थितो न दु:खेन गुरुणापि विचाल्यते ।।२२।।
मग मेरुपासूनि थोरें । देह दु:खाचेनि डोंगरें । दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ।।६९।। कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोची नये ।।३७०।। ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ।।७१।।
तं विद्याद् दु:खसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ।।२३।।
जया सुखाचिया गोडी । मन आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ।।७२।। जे योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागीं ।।७३।। तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे । देखिले तरी आंगें । होईजेल गा ।।७४।।
संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषत: ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्तत: ।।२४।।
परी तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखवीजे ।।७५।। हा विषयांतें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवितासी ।।७६।। ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ।।७७।।
शनै: शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मन: कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ।।२५।।
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ।।२६।।
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ।।७८।। याही एके परी । प्राप्ति आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ।।७९।। आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला- । बाहेरा नोहे ।।३८०।। जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें । न राहे तरी घालावें । मोकलूनि ।।८१।। मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्यचि होईल । सवे यया ।।८२।।
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ।।२७।।
पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ।।८३।। तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ।।८४।। आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ।।८५।। तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होयें । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ।।८६।।
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मष: ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुुते ।।२८।।
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ।।८७।। तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडू नेणें ।।८८।। तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ।।८९।। ऐसें आपले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ।।३९०।।
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन: ।।२९।।
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ।।३०।।
तरी मी तंव सकळ देहीं । असें एथ विचारू नाहीं । आणि तैसेंचि माझां ठायीं । सकळ असे ।।९१।। हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें । बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ।।९२।। एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ।।९३।। भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंत:करणें । केवळ एकत्वचि माझें जाणे । सर्वत्र जो ।।९४।। मग तो एक हा मियां । बोलतां दिसतसे वायां । ये-हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मिचि आहें ।।९५।। दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा । तो माझां ठायीं तैसा । मी तयामाजीं ।।९६।। जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु । तैसा माझेनि रूपें रूपसु । पुरुषु तो गा ।।९७।।
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थित: ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ।।३१।।
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ।।९८।। कां स्वरूपें तरी बहुतें आहातीं । परी तैसीं सोनीं बहुवें न होतीं । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ।।९९।। नातरी वृक्षांची पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ।।४००।। तो पंचात्मकीं सांपडे । मग सांग पां कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ।।१।। माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें । तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ।।२।। आतां शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे । ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ।।३।।
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत: ।।३२।।
म्हणोनि असो तें विशेषें । आपणपयासारिखें । जो चराचर देखे । अखंडित ।।४।। सुखदु:खादि वर्में । कां शुभाशुभें कर्में । दोनीं ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ।।५।। हे समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व । तें मानी जैसे अवयव । आपुले होती ।।६।। हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें । मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ।।७।। तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदु:खी तयातें म्हणती । परी आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ।।८।। म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होइजे । ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।।९।। हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं । जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।।४१०।।
अर्जुन उवाच
योऽयं योगस्त्वया प्रोक्त: साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ।।३३।।
चञ्चलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।३४।।
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ।।११।। हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे । येऱ्हवीं राहटावया थोडें । त्रैलोक्य यया ।।१२।। म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जें मर्कट समाधी येईल । कां राहे म्हणितलिया राहेल । महावातु ।।१३।। जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येंसी हातफळी । मिळऊनि जाय ।।१४।। जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ।।१५।। जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ।।१६।। म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य येईल । हें विशेषेंही न घडेल । तयालागीं ।।१७।।
श्रीभगवानुवाच
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।।३५।।
तंव श्रीकृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ।।१८।। परी वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरी केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ।।१९।। कां जें यया मनाचें एक निकें । जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।।४२०।।
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मति: ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायत: ।।३६।।
एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ।।२१।। परी यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देऊनि ।।२२।। या जालिया मानसा कहीं । युक्तीचि कांबी लागली नाहीं । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ।।२३।। म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ।।२४।। तरी योगसाधन जितुकें । तें आघवेंचि काय लटिकें । परी आपणपयां अभ्यासु न ठाके । हेंचि म्हणें ।।२५।। आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।।२६।। तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साच योगबळेंसी न तुके । मनोबळ ।।२७।। तरी तोचि योगु कैसा केविं जाणों । आम्ही येतुले दिया मातुही नेणों । म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर हे ।।२८।। हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ।।२९।।
अर्जुन उवाच
अयति: श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानस: ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ।।३७।।
कच्चिन्नोेभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण: पथि ।।३८।।
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषत: ।
त्वदन्य: संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ।।३९।।
परी आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाही ।।४३०।। म्हणोनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रद्धा । उपायेंवीण ।।३१।। इंद्रियग्रामौनि निगाला । आस्थेचिया वाटा लागला । आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ।।३२।। तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ।।३३।। जैसें अवकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ।।३४।। तैसीं दोन्हीं दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली । आणि अप्राप्तिही सांडवली । श्रद्धा तया ।।३५।। ऐसा वोलांतरला कां जी । जो श्रद्धेचांचि समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ।।३६।।
श्रीभगवानुवाच
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति ।।४०।।
तंव श्रीकृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावांचूनि अन्यथा । गती आहे गा ।।३७।। परी एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसंवावें पडे । तेंही परी ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ।।३८।। येऱ्हवीं अभ्यासाचां उचलता । पाऊलीं जरी चालता । तरी दिवसाआधीं ठाकिता । सोहंसिद्धीतें ।।३९।। परी तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ।।४४०।।
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती: समा: ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ।।४१।।
ऐकें कवतिक हें कैंसे । शतमखा लोक सायासें । ते तो पावे अनायासें । कैवल्यकामु ।।४१।। मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ।।४२।। हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता । दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ।।४३।। पाठीं जन्मे संसारीं । परी सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचां ।।४४।। जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावेंं तें देखिजे । शास्त्रदृष्टी ।।४५।। वेद तो जागेश्वरू । जया व्यवसाय निजाचारु । सारासार विचारु । मंत्री जयातें ।।४६।। जयाचां कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ।।४७।। ऐसी निजपुण्याचीया जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ।।४८।।
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ।।४२।।
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूय: संसिद्धौ कुरुनन्दन ।।४३।।
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ।।४९।। जे सिद्धांताचां सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूंजते कोकील वनीं । संतोषाचां ।।४५०।। जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचां कुळीं । जन्म पावे ।।५१।। मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पहाट फुटे । सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ।।५२।। तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ।।५३।। तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ।।५४।। ऐसे जे जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जपहोम । करिती सदा ।।५५।। अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसे जन्म पार्था गा जे । ते तो पावे ।।५६।।
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि स: ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ।।४४।।
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीविता जाहली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ।।५७।। तेथ सदैवा आणि पायाळा । वरी दिव्यांजन होय डोळां । मग देखे जैंसी अवलीळा । पाताळधनें ।।५८।। तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धि तयाची ।।५९।। बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ।।४६०।। ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधि घर पुसे । मानसाचें ।।६१।। जाणिजे योगपीठींचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ।।६२।। हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचें दीप । जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ।।६३।। तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहुनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ।।६४।।
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिष: ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ।।४५।।
जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ।।६५।। म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ।।६६।। पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां । मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ।।६७।। तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे । आपणपां आपण मुरे । आकाशही ।।६८।। प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ।।६९।। ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ।।४७०।। तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं । म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ।।७१।। आणि तद्रूपतेसि लग्न । लागोनि ठेलें अभिन्न । जैसें लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ।।७२।। तैसे विश्व जेथ होये । मागौतें तेथ लया जाये । तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ।।७३।।
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिक: ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ।।४६।।
जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।।७४।। कां जिये एकी वस्तुलागीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । जुंझत प्रपंचेंशी समरंगीं । ज्ञानिये गा ।।७५।। अथवा निलागे निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ।।७६।। जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचें याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदां ।।७७।। तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण । जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ।।७८।। म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियासि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ।।७९।। पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा । तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ।।४८०।। म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें । योगी होय अंत:करणें । पंडकुमरा ।।८१।।
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मत: ।।४७।।
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे । आणि सुख सर्वस्व माझें । चैतन्य तो ।।८२।। जया भजता भजन भजावें । हें भक्तिसाधन जें आघवें । तें मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ।।८३।। मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरूप बोलीं निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ।।८४।। तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेंचि होय ।।८५।। ऐसें भक्तचकोरचंद्रें । तेथ त्रिभुवनैकनरेंद्रे । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ।।८६।। तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि अवस्था । दुणावली हें यदुनाथा । पावों सरलें ।।८७।। कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें आतां उपलवला । निरूपील ।।८८।। तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसेल उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ।।८९।। जें सात्त्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें । सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ।।४९०।। वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।।९१।। ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरूंनीं केला कोडें । माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ।।९२।। म्हणऊनि येणें मुखें जें निगे । तें संतांचां हृदयीं साचचि लागे । हें असो सांगें श्रीरंगें । बोलिलें जें ।।९३।। परी तें मनाचां कानीं ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावें । हे साटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ।।९४।। अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयाआंतौतें । हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ।।९५।। हे स्वहितातें नीवविती । परिणामातें जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जिवा ।।९६।। आतां अर्जुनेसीं मुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें । तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ।।४९७।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्याय: ।।६।।
।।श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा समाप्त ।। (श्लोक ४७, ओव्या ४९७)
।। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ।।
श्रीभगवानुवाच
अनाश्रित: कर्मफलं कार्यं कर्म करोति य: ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिय: ।।१।।
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं । येऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही। तंव एकचि ते ।।३९।। सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पहातां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ।।४०।। जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहीं मार्गीं जाणें । एकाचि ठाया ।।४१।। नातरी एकचि उदक सहजें । परी सिनानां घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व हे जाणिजे । योगसंन्यासांचें ।।४२।। आइकें सकळसंमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ।।४३।। जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिचिं तियें बीजें । अपेक्षीना ।।४४।। तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरे । करणें पावे ।।४५।। तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ।।४६।। ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ।।४७।। वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडीण बद्धक । तरी टांकोटाकीं आणिक एक । मांडीचि तो ।।४८।। जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ।।४९।। गृहस्थाश्रमाचें ओझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ।।५०।। म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ।।५१।।
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ।।२।।
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।।५२।। जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटे । साचें जया ।।५३।।
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शम: कारणमुच्यते ।।३।।
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ।।५४।। येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाऊलवाटें । येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ।।५५।। मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाहि पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा। कडेलग ।।५६।। तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखी लागेल ढाळेंढाळें । वैराग्याची ।।५७।। ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ।।५८।। मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ।।५९।। जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ।।६०।। येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांंगेन आइकें ।।६१।।
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ।।४।।
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा। नाहीं विषयांचिया येरझारा। जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ।।६२।। जयाचें सुखदु:खाचेनि आंगें । झगटले मानस चेवो नेघे । विषय पासींही आलियां से न रिघे । हें काय म्हणऊनि ।।६३।। इंद्रियें कर्माचां ठायी । वाढीनलीं परी कहीं । फळहेतूची चाड नाही । अंत:करणीं ।।६४।। असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ।।६५।। तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां । सांगें तया ऐसी हे योग्यता । कवणें दीजे ।।६६।।
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ।।५।।
तंव हांसोनि कृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणे । कवणासि काय दिजेल कवणें । येथ अद्वैतीं इयें ।।६७।। पैं व्यामोहाचिया शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे । ते वेळीं दु:स्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूचां ।।६८।। पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो। ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोही आपणपांचि ।।६९।। म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु किजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ।।७०।।
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित: ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ।।६।।
हा विचारूनि अहंकारू सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ।।७१।। एऱ्हवी कोशकीटकाचिया परी । तो आपणपयां आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळी ।।७२।। कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवां आंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ।।७३।। कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंदु अंत:करणें । घेऊनि ठाके ।।७४।। येऱ्हवीं होय तें तोचि आहे । परी काई कीजे बुद्धि तैसी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ।।७५।। जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोंविन्नली येरी मोहरें । तरी तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ।।७६।। वायांचि मान पिळी । आटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरूनि ठाके ।।७७।। म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ।।७८।। ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधला । मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ।।७९।। म्हणऊनि आपणपयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ।।८०।।
जितात्मन: प्रशान्तस्य परमात्मा समाहित: ।
शीतोष्णसुखदु:खेषू तथा मानापमानयो: ।।७।।
तया स्वांत:करणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दूरी नाहीं ।।८१।। जैसा किडाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोेपीं ।।८२।। हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ।।८३।। तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ।।८४।। आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदु:खाची कडसणी । इयें न समाती कांही बोलणीं । मानापमानाचीं ।।८५।। जे जया वाटा सूर्यु जाये ।। तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणऊनि ।।८६।। देखें मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैसीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हतीं आनें ।।८७।।
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रिय: ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन: ।।८।।
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ।।८८।। आतां व्यापकुं कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैसी । दुजेनवीण ।।८९।। ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके । जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ।।९०।। तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणें सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ।।९१।। देखें सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ।।९२।। पाहातां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनघ्र्य रत्न चोखडें । देखे दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ।।९३।।
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ।।९।।
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेदु विचित्रु । कल्पूं कैंचा ।।९४।। तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।।९५।। मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरिटी । काय परिसाचिया कसवटी । वानिया कीजे ।।९६।। ते जैसी निर्वाण सुवर्णुचि करी । तैसी जयाची बुद्धि चराचरी । होय साम्याची उजरी । निरंतर ।।९७।। जें ते विश्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकेचि भांगारें । परब्रह्में ।।९८।। ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें । म्हणोनि अहाचवाहाचें न झकवें । येणें आकारचित्रें ।।९९।। घापे पटामाजीं दृष्टी । दिसे तंतुची सैंघ सृष्टी । परी तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ।।१००।। ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभवो जयातें असे । तोचि समबुद्धि हें अनारिसें । नव्हे जाणें ।।१।। जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासी ।।२।। जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये । देखें स्वर्गसुखादि इये । खेळु जयाचा ।।३।। विपायें जरी आठवले चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयाते प्रशंसिता । लाभु आथि ।।४।।
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थित: ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रह: ।।१०।।
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपण असे । अखंडित ।।५।। ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ।।६।। ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ।।७।। जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ।।८।। प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न पुरे ।।९।। जयाचेनि आंगिके तेजें । आवो रविशशीचिये वाणिजे । म्हणऊनि जग हें वेसजे- । वीण असे तया ।।११०।। हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसें टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ।।११।। म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों ते ।।१२।। ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुनु पढिये हे गोडी । नासेल हन ।।१३।। म्हणोनि तें तैसें बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ।।१४।। जया सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ।।१५।। विपायें अहंभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ।।१६।। दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । ना तरी दाटूनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ।।१७।। आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ।।१८।। इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ।।१९।। हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ।।१२०।। हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ।।२१।। तैसें जाहलें अनंता । ऐेसें तरी मी न म्हणता । जरी तयाचा न देखता । अतिशयो एथ ।।२२।। पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंझ । परी पुढें वालभाचें भोज । नाचत असे ।।२३।। आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ।।२४।। म्हणऊनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखें शृंगारलिया मानसा। दर्पणु तो ।।२५।। यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ।।२६।। हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका आहे सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ।।२७।। पासींचि गोसावी वर न वानिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुनुचि तो सहजें । पढिये हरी ।।२८।। पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहीहूनि काय न वर्णिजे । पतिव्रता ।।२९।। तैसा अर्जुनूचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जें तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ।।१३०।। जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ।।३१।। तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनि आली ।।३२।। हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचें ।।३३।। कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार । हेचि श्लोकार्थकुमुदि फार । साविया होती ।।३४।। चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ।।३५।। तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ।।३६।। देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ।।३७।। म्हणऊनि बहुदिवस वोळगावा । कां अवसरु पाहोनी विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ।।३८।। हें असो कथा सांगे वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ।।३९।। एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परी तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ।।१४०।। जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होइजेल । काय जाहलें अभ्यासिजेल । सांगाल ते ।।४१।। हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंत:करणी । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ।।४२।। हें अंगें म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हांसोनि कृष्ण हो कां । करूं म्हणती ।।४३।। देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडलिया कवणेकडे । अपुरें असे ।।४४।। तैसा सर्वेश्वरू बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परी कैसा भारें आतला पिकें । दैैवाचेनि ।।४५।। जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांहीं महागु भेटी । तो अधीनु केतुला किरीटी । जें बोलुही न साहे ।।४६।। मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ।।४७।। तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परी उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धिचिया ।।४८।। ये-हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जें सोहंभाव महुरें । मोडोनि आला ।।४९।। म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । ययासि वेळु न लगेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ।।१५०।। म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आता आरंभींच यया फळेल । म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ।।५१।। ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ।।५२।। तेथ प्रवृत्तितरूचां बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गींचा कापडी । महेशु आझुनी ।।५३।। पंै योगिवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाचां पाउलीं । धोरणु पडिला ।।५४।। तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ।।५५।। पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ।।५६।। हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ।।५७।। चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । अव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ।।५८।। निगिजे पूर्वीलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें येथिचें ।।५९।। येणें मार्गें जया ठाया जाईजे । तो गांवो आपणचि होइजे । हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ।।१६०।। तेथ पार्थु म्हणितले देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ।।६१।। तंव कृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें । आम्ही सांगतसों आपैसें । वरी पुशिलें तुवां ।।६२।।
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन: ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ।।११।।
तरी विशेषें आतांचि बोलिजेल । परी तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणोनि तैसें एक लागेल । स्थान पाहावें ।।६३।। जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासि दुणीव चढे । देखिलिया जें ।।६४।। जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ।।६५।। अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ।।६६।। जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाहि आस्था । समूळ होय ।।६७।। स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परी माघौता । निघों विसरे ।।६८।। ऐसे न राहतयातें राहवी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ।।६९।। हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें शृंगारियांहि उपजे । देखत खेंवो ।। १७०।। जें येणें मानें बरवंट । आणि तैसेंचि अति चोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ।।७१।। आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । मैळेचिना ।।७२।। जेथ अमृताचेनी पाडें । मुळेंहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ।।७३।। पाउला पाउला उदकें । परी वर्षाकाळीही चोखें । निर्झरें कां विशेखे । सुलभें जेथ ।।७४।। हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंद झुळके ।।७५।। बहुत करूनि नि:शब्द । दाट न रिघें श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ।।७६।। पाणिलगें हंसे । दोनी चारी सारसें । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ।।७७।। निरंतर नाहीं । तरी आली गेलीं कांहीं । होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणोें ।।७८।। परी आवश्यक पांडवा । ऐसा ठाव जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।।७९।। दोहींमाजीं आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुत करूनि एकांतें । बैसिजे गा ।।१८०।। म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।।८१।। वरी चोखट मृगसेवडी । माजीं धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकुर ।।८२।। सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकेपाडें तैसें । वोजा घालीं ।।८३।। परी सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ।।८४।। म्हणोनि तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो होआवें । आसन ऐसें ।।८५।।
तत्रैकाग्रं मन: कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिय: ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ।।१२।।
मग तेथ आपण । एकाग्र अंत:करण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ।।८६।। तैसे स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे । जंव कठीणपण विरे । अहंभावाचें ।।८७।। विषयांचा विसरू पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ।।८८।। ऐसें ऐक्य हें सहजें । फांवें तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ।।८९।। आतां आंगातें अंग करी । पवनातें पवनुचि वरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ।।१९०।। प्रवृत्ति माघौती मोहरे । समाधि ऐेलाडी उतरे । आघवें अभ्यासूं सरे । बैसत खेंवो ।।९१।। मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी ऊरु या जघनासी । जडोनि घालीं ।।९२।। चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाचां बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ।।९३।। सव्य तें तळीं ठेविजे । तेणे सिवणीमध्यु पीडिजे । वरि बैसे तो सहजें । वामचरणु ।।९४।। गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ।।९५।। माजीं अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहेटिजे वरी आंगें । पेललेनी ।।९६।। उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ।।९७।। मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ।।९८।। अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ।।९९।। ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहटों लागे ।।२००।।
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ।।१३।।
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ।।१।। माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ।।२।। वरचिलें पातीं ढळती । तळींचीं तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ।।३।। दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ।।४।। ऐसें आंतुचां आंतुचि रचे । बाहेरी मागुतीं न वचे । म्हणोनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ।।५।। आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वाट पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ।।६।। मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौती दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षस्थळीं ।।७।। माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जाळंधरू म्हणिपे । पंडुकुमरा ।।८।। नाभी वरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ।।९।। स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानतळवटीं । बंधु पडे किरिटी । वोढियाणा तो ।।२१०।।
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थित: ।
मन: संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पर: ।।१४।।
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।।११।। कल्पना निमे । प्रवृत्ति शमे । आंग मन विरमे । सावियाचि ।।१२।। क्षुधा काय जाहली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ।।१३।। जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ।।१४।। क्षोभलेपणें माजे । उवाइलाठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ।।१५।। मग थांवलि ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ।।१६।। भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्तांचे थारे । उरों नेदी ।।१७।। धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्ज़ा काढी । अस्थिगत ।।१८।। नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ।।१९।। व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ।।२२०।। तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ति करी उजगरा । कुंडलिनीये ।।२१।। नागाचे पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ।।२२।। तैसी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ।।२३।। विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटींव जैशी ।।२४।। तैसी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । ते वज्रासनें चिमुटली । सावध होय ।।२५।। तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ।।२६।। तैसी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ।।२७।। सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ।।२८।। तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाची मिठी । देऊनि घाली ।।२९।। मुखींचां ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगु लागे ।।२३०।। जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाऊस । पाठी एकदोनी घांस । हियांही भरी ।।३१।। मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वींचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ।।३२।। अधार तरी न संडी । परी नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेंशी ।।३३।। अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ।।३४।। मग सप्तधातूंचां सागरीं । तहानेली घोट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ।।३५।। नासापुटौनि वारा । जो जातसें अंगुळें बारा । तो गचिये धरूनि माघारा । आंतु घाली ।।३६।। तेथ अध वरौतें आकुंचे । ऊध्र्व तळौतें खाचे । तया खेंवामाजि चक्रांचे । पदर उरती ।।३७।। येऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथें ।।३८।। आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांही नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ।।३९।। ऐसीं दोनीं भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ।।२४०।। तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ।।४१।। तो आगी आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ।।४२।। मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ।।४३।। इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ।।४४।। मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे । ४५।। बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ।।४६।। तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ।।४७।। तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ।।४८।। तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ।।४९।। तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरें । पांघुरली असे ।।२५०।। जैसी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ती । धरुं नये ।।५१।। तैसा आहाचवरी कोरडा । त्वचेचा असे पातवडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ।।५२।। मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ।।५३।। नातरी संध्यारागिंचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । कीं अंतर्ज्योतिचें लिंग । निर्वाळिलें ।।५४।। कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतिंव । मज पाहतां सावेव । शांतीचि ते ।।५५।। तें आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ।।५६।। तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ।।५७।। हो कां जे शारदियेचिये वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरीं ।।५८।। तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ।।५९।। वृद्धाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ।।२६०।। वयसा तरी येतुलेवरी । येऱ्हवीं बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ।।६१।। कनकद्रुमाचां पालवी । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसी बरवीं । नवीं निघती ।।६२।। दांतही आन होती । परी अपाडें सानेजती । जैसीं दुबाही बैसे पांती । हिरेयांची ।।६३।। माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमाणिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया ।।६४।। करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें । पाखाळीं होती डोळे । काय सांगों ।।६५।। निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैसीं उतटे । शुक्तिपल्लवांची ।।६६।। तैसी पातियांचिये कळविये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे । आधिलीचि परी होये । गगना कळिती ।।६७।। आइकें देह होय सोनियाचें । परी लाघव ये वायूचें । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ।।६८।। मग समुद्रापैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचें ।।६९।। पवनाचा वारिकां वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ।।२७०।। आइकें प्राणाचा हात धरूनि । गगनाची पाऊटी करूनि । मध्यमेचेनि दादरेहुनी । हृदया आली ।।७१।। ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ।।७२।। जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमी ।।७३।। हें असो ते कुंडली । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचां बोली । चावळे ते ।।७४।। शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें आलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ।।७५।। घोषाचां कुंडीं । नादचित्रांची रूपडीं । प्रणवाचियां मोडी । रेखिली ऐसीं ।।७६।। हेंचि कल्पावेंं तरी जाणिजे । परी आतां कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ।।७७।। विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुमे ।।७८।। तया अनाहताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानीचें बेगें । फिटलें सहजें ।।७९।। आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्यें आधातुरें । करूनि असिजे ।।२८०।। तया हृदयाचां परिवरी । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ।।८१।। बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ।।८२।। ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळी कैसी गमली । म्हणावी पां ।।८३।। हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ।।८४।। नातरी वारयाचेनि अंगे झगटली । दीपाची दिठी निमटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ।।८५।। तैसी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे सोनियाची जैसी सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ।।८६।। मग तिये हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तिचिमाजीं ।।८७।। तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । येऱ्हवीं तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नादबिंदु नेणिजे । कलाज्योती ।।८८।। मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु । ध्यानाचा आदरु । नाहीं परी ।।८९।। हे कल्पना घे सांडी । ते नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ।।२९०।। पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परी दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ।।९१।। तया ध्वनिताचें केणें सोडूनि । यथार्थाची घडी झाडूनि । उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ।।९२।।
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानस: ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ।।१५।।
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहाचें रूप हारपें । मग तो डोळियांची माजि लपें । जगाचिया ।।९३।। येऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी असे । परी वायूचें का जैसें । वळिलें होय ।।९४।। ना तरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा । कां अवयवचि नभा । निवडला तो ।।९५।। तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।। हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ।।९६।। देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये । हे अणिमादिक ।।९७।। परी तेणें काय काज आपणपयां । अवधारीं ऐसा धनंजया । लोपु आथी भूतत्रया । देहींचा देहीं ।।९८।। पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ।।९९।। पाठीं आपण एकला उरे । परी शरीराचेनि अनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ।।३००।। ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसे नाम होये । परी शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ।।१।। मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ।।२।। ते ओंकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ।।३।। पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरीं । भरती गमे सागरीं । सरिता जैसी ।।४।। मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोहंभावाचिया बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ।।५।। तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटे । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ।।६।। पैं मेघाचेनि मुखी निवडला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेयां ।।७।। तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ।।८।। आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐसिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।।९।। गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।।३१०।। म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।।११।। अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी। ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।।१२।। भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ।।१३।। पाठीं तेथेंचि तो भासळला । तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाही बरी आटु भविन्नला । आकाशाचा ।।१४।। आतां महाशून्याचां डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ।।१५।। म्हणूनि आखरामाजीं सांपडे । कीं कानावरी जोडे । हें तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ।।१६।। जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ।।१७।। पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ।।१८।। ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ।।१९।। जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।।३२०।। जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले ।।२१।। जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचे केवळ । चैतन्य गा ।।२२।। जें महाभूतांचे बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ।।२३।। तें हें चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ।।२४।। तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले ते पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरी ।।२५।। आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीर जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ।।२६।। परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।।२७।। जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ।।२८।। कां जे आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ।।२९।। इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ।।३३०।। देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केविं ।।३१।। म्हणऊनि एथ कांही । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देर्इं । बोला एका ।।३२।। आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परी न शकें करूं पांगु । योग्यतेचा ।।३३।। सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाचि जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ।।३४।। नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ।।४५।। जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देईजो ।।३६।। हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्ही निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ।।३७।। कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं । तेथ कृष्ण म्हणती तरी काई । धनुर्धरा ।।३८।। हें काज कीर निर्वाण । परी आणिकही जें कांहीं साधारण । तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धी जाय ।।३९।। पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीचि अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभीं फळें ।।३४०।। तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं । आणि योग्यांची काई । खाणी असे ।।४१।। नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु । तरी तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ।।४२।। येतुलालिये आयणीमाजीं येवढें । योग्यपण तुंतेंही जोडे । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ।।४३।। मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ।।४४।।
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत: ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ।।१६।।
जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसि जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ।।४५।। अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारूनियां ।।४६।। निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मग योगु कवणाचा ।।४७।। म्हणोनि अतिशयें विषय सेवावा । तैसा विरोध न व्हावा । कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ।।४८।।
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा ।।१७।।
आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजें । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ।।४९।। मपितला बोली बोलिजे । मितला पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ।।३५०।। जागणें जरी जाहालें । तरी व्हावें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ।।५१।। ऐसें युक्तीचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ।।५२।।
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निस्पृह: सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ।।१८।।
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत आंत सुख वाढे । तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ।।५३।। जैसें भाग्यचिये भडसें । उद्यमाचेनि मिषें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ।।५४।। तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ।।५५।। म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गींचिये राणिवा । अळंकरिजे ।।५६।।
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मन: ।।१९।।
युक्ति योगाचें अंग पावे । ऐसें प्रयाग होय जे बरवें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ।।५७।। तयातें योगयुक्त म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ।।५८।। आतां तुझे मनोगत जाणोनी । कांहीं एक आम्ही म्हणोनी । तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ।।५९।। तूं प्राप्तीची चाड वाहसी । परी अभ्यासु दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ।।३६०।। तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल इये दुर्जनें । इंद्रियें करिती ।।६१।। पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ।।६२।। ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखें । येऱ्हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ।।६३।।
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ।।२०।।
सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वत: ।।२१।।
म्हणोनि आसनाचिया गाढिका । जो आम्ही अभ्यासु सांगितला निका । तेणें होईल तरी हो कां । निरोधु ययां ।।६४।। येऱ्हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदान लागे । तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ।।६५।। परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियातें आपण देखे । देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ।।६६।। तिये वोळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । चित्तपण समरसें । विरोनि जाय ।।६७।। जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं । तें आपणचि आपुलया ठायीं । होऊनि ठाके ।।६८।।
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत: ।
यस्मिन्स्थितो न दु:खेन गुरुणापि विचाल्यते ।।२२।।
मग मेरुपासूनि थोरें । देह दु:खाचेनि डोंगरें । दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ।।६९।। कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोची नये ।।३७०।। ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ।।७१।।
तं विद्याद् दु:खसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ।।२३।।
जया सुखाचिया गोडी । मन आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ।।७२।। जे योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागीं ।।७३।। तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे । देखिले तरी आंगें । होईजेल गा ।।७४।।
संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषत: ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्तत: ।।२४।।
परी तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखवीजे ।।७५।। हा विषयांतें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवितासी ।।७६।। ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ।।७७।।
शनै: शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मन: कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ।।२५।।
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ।।२६।।
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ।।७८।। याही एके परी । प्राप्ति आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ।।७९।। आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला- । बाहेरा नोहे ।।३८०।। जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें । न राहे तरी घालावें । मोकलूनि ।।८१।। मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्यचि होईल । सवे यया ।।८२।।
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ।।२७।।
पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ।।८३।। तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ।।८४।। आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ।।८५।। तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होयें । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ।।८६।।
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मष: ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुुते ।।२८।।
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ।।८७।। तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडू नेणें ।।८८।। तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ।।८९।। ऐसें आपले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ।।३९०।।
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन: ।।२९।।
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ।।३०।।
तरी मी तंव सकळ देहीं । असें एथ विचारू नाहीं । आणि तैसेंचि माझां ठायीं । सकळ असे ।।९१।। हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें । बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ।।९२।। एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ।।९३।। भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंत:करणें । केवळ एकत्वचि माझें जाणे । सर्वत्र जो ।।९४।। मग तो एक हा मियां । बोलतां दिसतसे वायां । ये-हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मिचि आहें ।।९५।। दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा । तो माझां ठायीं तैसा । मी तयामाजीं ।।९६।। जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु । तैसा माझेनि रूपें रूपसु । पुरुषु तो गा ।।९७।।
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थित: ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ।।३१।।
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ।।९८।। कां स्वरूपें तरी बहुतें आहातीं । परी तैसीं सोनीं बहुवें न होतीं । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ।।९९।। नातरी वृक्षांची पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ।।४००।। तो पंचात्मकीं सांपडे । मग सांग पां कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ।।१।। माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें । तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ।।२।। आतां शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे । ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ।।३।।
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत: ।।३२।।
म्हणोनि असो तें विशेषें । आपणपयासारिखें । जो चराचर देखे । अखंडित ।।४।। सुखदु:खादि वर्में । कां शुभाशुभें कर्में । दोनीं ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ।।५।। हे समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व । तें मानी जैसे अवयव । आपुले होती ।।६।। हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें । मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ।।७।। तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदु:खी तयातें म्हणती । परी आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ।।८।। म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होइजे । ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।।९।। हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं । जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।।४१०।।
अर्जुन उवाच
योऽयं योगस्त्वया प्रोक्त: साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ।।३३।।
चञ्चलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।३४।।
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ।।११।। हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे । येऱ्हवीं राहटावया थोडें । त्रैलोक्य यया ।।१२।। म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जें मर्कट समाधी येईल । कां राहे म्हणितलिया राहेल । महावातु ।।१३।। जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येंसी हातफळी । मिळऊनि जाय ।।१४।। जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ।।१५।। जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ।।१६।। म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य येईल । हें विशेषेंही न घडेल । तयालागीं ।।१७।।
श्रीभगवानुवाच
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।।३५।।
तंव श्रीकृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ।।१८।। परी वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरी केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ।।१९।। कां जें यया मनाचें एक निकें । जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ।।४२०।।
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मति: ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायत: ।।३६।।
एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ।।२१।। परी यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देऊनि ।।२२।। या जालिया मानसा कहीं । युक्तीचि कांबी लागली नाहीं । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ।।२३।। म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ।।२४।। तरी योगसाधन जितुकें । तें आघवेंचि काय लटिकें । परी आपणपयां अभ्यासु न ठाके । हेंचि म्हणें ।।२५।। आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।।२६।। तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साच योगबळेंसी न तुके । मनोबळ ।।२७।। तरी तोचि योगु कैसा केविं जाणों । आम्ही येतुले दिया मातुही नेणों । म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर हे ।।२८।। हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ।।२९।।
अर्जुन उवाच
अयति: श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानस: ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ।।३७।।
कच्चिन्नोेभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण: पथि ।।३८।।
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषत: ।
त्वदन्य: संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ।।३९।।
परी आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाही ।।४३०।। म्हणोनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रद्धा । उपायेंवीण ।।३१।। इंद्रियग्रामौनि निगाला । आस्थेचिया वाटा लागला । आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ।।३२।। तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ।।३३।। जैसें अवकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ।।३४।। तैसीं दोन्हीं दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली । आणि अप्राप्तिही सांडवली । श्रद्धा तया ।।३५।। ऐसा वोलांतरला कां जी । जो श्रद्धेचांचि समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ।।३६।।
श्रीभगवानुवाच
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति ।।४०।।
तंव श्रीकृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावांचूनि अन्यथा । गती आहे गा ।।३७।। परी एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसंवावें पडे । तेंही परी ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ।।३८।। येऱ्हवीं अभ्यासाचां उचलता । पाऊलीं जरी चालता । तरी दिवसाआधीं ठाकिता । सोहंसिद्धीतें ।।३९।। परी तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ।।४४०।।
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती: समा: ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ।।४१।।
ऐकें कवतिक हें कैंसे । शतमखा लोक सायासें । ते तो पावे अनायासें । कैवल्यकामु ।।४१।। मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ।।४२।। हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता । दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ।।४३।। पाठीं जन्मे संसारीं । परी सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचां ।।४४।। जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावेंं तें देखिजे । शास्त्रदृष्टी ।।४५।। वेद तो जागेश्वरू । जया व्यवसाय निजाचारु । सारासार विचारु । मंत्री जयातें ।।४६।। जयाचां कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ।।४७।। ऐसी निजपुण्याचीया जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ।।४८।।
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ।।४२।।
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूय: संसिद्धौ कुरुनन्दन ।।४३।।
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ।।४९।। जे सिद्धांताचां सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूंजते कोकील वनीं । संतोषाचां ।।४५०।। जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचां कुळीं । जन्म पावे ।।५१।। मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पहाट फुटे । सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ।।५२।। तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ।।५३।। तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ।।५४।। ऐसे जे जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जपहोम । करिती सदा ।।५५।। अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसे जन्म पार्था गा जे । ते तो पावे ।।५६।।
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि स: ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ।।४४।।
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीविता जाहली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ।।५७।। तेथ सदैवा आणि पायाळा । वरी दिव्यांजन होय डोळां । मग देखे जैंसी अवलीळा । पाताळधनें ।।५८।। तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धि तयाची ।।५९।। बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ।।४६०।। ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधि घर पुसे । मानसाचें ।।६१।। जाणिजे योगपीठींचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ।।६२।। हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचें दीप । जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ।।६३।। तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहुनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ।।६४।।
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिष: ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ।।४५।।
जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ।।६५।। म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ।।६६।। पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां । मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ।।६७।। तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे । आपणपां आपण मुरे । आकाशही ।।६८।। प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ।।६९।। ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ।।४७०।। तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं । म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ।।७१।। आणि तद्रूपतेसि लग्न । लागोनि ठेलें अभिन्न । जैसें लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ।।७२।। तैसे विश्व जेथ होये । मागौतें तेथ लया जाये । तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ।।७३।।
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिक: ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ।।४६।।
जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।।७४।। कां जिये एकी वस्तुलागीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । जुंझत प्रपंचेंशी समरंगीं । ज्ञानिये गा ।।७५।। अथवा निलागे निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ।।७६।। जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचें याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदां ।।७७।। तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण । जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ।।७८।। म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियासि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ।।७९।। पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा । तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ।।४८०।। म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें । योगी होय अंत:करणें । पंडकुमरा ।।८१।।
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मत: ।।४७।।
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे । आणि सुख सर्वस्व माझें । चैतन्य तो ।।८२।। जया भजता भजन भजावें । हें भक्तिसाधन जें आघवें । तें मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ।।८३।। मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरूप बोलीं निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ।।८४।। तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेंचि होय ।।८५।। ऐसें भक्तचकोरचंद्रें । तेथ त्रिभुवनैकनरेंद्रे । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ।।८६।। तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि अवस्था । दुणावली हें यदुनाथा । पावों सरलें ।।८७।। कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें आतां उपलवला । निरूपील ।।८८।। तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसेल उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ।।८९।। जें सात्त्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें । सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ।।४९०।। वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।।९१।। ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरूंनीं केला कोडें । माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ।।९२।। म्हणऊनि येणें मुखें जें निगे । तें संतांचां हृदयीं साचचि लागे । हें असो सांगें श्रीरंगें । बोलिलें जें ।।९३।। परी तें मनाचां कानीं ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावें । हे साटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ।।९४।। अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयाआंतौतें । हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ।।९५।। हे स्वहितातें नीवविती । परिणामातें जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जिवा ।।९६।। आतां अर्जुनेसीं मुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें । तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ।।४९७।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्याय: ।।६।।
।।श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा समाप्त ।। (श्लोक ४७, ओव्या ४९७)
।। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ।।